मुंबईत एकाच वेळी ३८ ठिकाणची जलवाहिन्यांची कामे

190

मुंबई महानगरपालिकेच्या भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास पर्यायी ४००० मिमी व्यासाची जलवाहिनी जोडणे, तसेच २४०० व १२०० मिमी व्यासाच्या झडपा बसविणे, गळती दुरुस्ती करणे व इतर संलग्न अशी कामे हाती घेण्यात आली होती. भांडूप संकुलातील ८ कामांसह पश्चिम उपनगर व शहर विभाग मिळून ३० कामे अशी एकूण तब्बल ३८ कामे एकाच वेळी सुरु हाती घेण्यात आली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढी कामे हाती घेण्याची ही मुंबईतील ही पहिलीच घटना आहे.

या सर्व कामांसाठी भांडुप संकुल येथील १,९१० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र सुमारे ४२ वर्षानंतर प्रथमच २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते. ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी समन्वयाने सर्व कामे पूर्ण करताना, तांत्रिक अडचणी देखील यशस्वीरितीने सोडवल्या.

जलबोगदा बंद करणे, पाणी उपसून बाहेर काढणे, झडपा बसवणे, छेद जोडण्या करणे, कामे पूर्ण करुन पुन्हा वाहिन्यांमध्ये पाणी सोडून योग्य दाबासह यंत्रणा सुरळीत झाल्याची खात्री करणे, ही आव्हानात्मक कामे जलअभियंता खात्याने यशस्वीरित्या पूर्णत्वास नेली आहेत. संध्याकाळी ही उर्वरित अंतिम कामे पूर्णत्वास आली.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी भांडूप संकुलास भेट देऊन तेथील सर्व कामांची बारकाईने पाहणी केली. तसेच आव्हानात्मक कामे अभियांत्रिकी व तांत्रिकी कौशल्यासह वेळेत पूर्ण केल्याबद्दल जलअभियंता खात्याचे अभिनंदनही केले. यावेळी उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे व सहकारी उपस्थित होते.

New Project 1 18

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.