मुंबईकरांनो आता पाणी उकळूनच प्या… महापालिकेचे आवाहन

पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून नंतर प्यावे.

78

भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात पावसाचे पाणी शिरुन जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये बिघाड झाला आहे. या कारणाने मुंबईत रविवार १८ जुलै रोजी होणारा पाणीपुरवठा बाधित झाला. संकुलातील जलशुद्धीकरण यंत्रणा सुरू करुन, मुंबईचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. दरम्यान, मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून नंतर प्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

पाणीपुरवठा बाधित

मुंबईत शनिवारी रात्रीपासून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. भांडुप परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे, भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाला. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून विद्युत पुरवठा देखील खंडित करावा लागला. भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील या समस्येमुळे मुंबई रविवारी होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे.

(हेही वाचाः भांडुप संकुलात तुंबले पाणी, मुंबईकरांच्या गेले नळाचे पाणी)

पाणी उकळून पिण्याचे आवाहन

भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी (filtration) व उदंचन (pumping) यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम करण्यात येत आहे. उदंचन यंत्रणा काही तासातच पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. मात्र गाळणी यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी जास्त कालावधी लागू शकतो. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून नंतर प्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

(हेही वाचाः विहार तलावही भरला, मुंबईकरांना पाणी तुंबण्याची भीती)

पाणीपुरवठा बाधित होऊन झालेल्या गैरसोयीबद्दल महापालिका प्रशासन दिलगिरी व्यक्त करत आहे. मुंबईकर नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती महापालिकेकडून करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.