लातूरचे ‘महारुद्र’ कोरोना काळातील ‘देवदूत’! मारली सेव्हन हिल्स मजल

महारुद्र यांचा हा जन्म केवळ कोरोनावर मात करण्यासाठीच झाला आहे. आज जर ते महापालिकेत नसते, तर...

186

लातूर शहरातील एका गावात जन्मणाऱ्या तरुणाने युपीएससी परीक्षा देत मोठा अधिकारी बनण्याचं स्वप्न बाळगलं हेातं. परंतु प्रत्येक प्रयत्नात तो काही गुणांच्या फरकाने त्याला परीक्षेत अपयश आले. तब्बल तीन ते चार वेळा परीक्षा देऊनही पदरी निराशाच पडल्याने, अखेर या तरुणाने कुटुंबाच्या चरितार्थाकरता महापालिकेत नोकरी पत्करली. परंतु आज हाच तरुण सेव्हन हिल्स रुग्णालयात महत्वाची भूमिका बजावत, अनेक कोरोना रुग्णांसाठी एकप्रकारे संकटकाळी धाऊन आलेल्या देवदूताप्रमाणेच भासत आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयावर नियंत्रण ठेवतानाच, ते महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या तरुण डॉक्टरने पुढे याच रुग्णालयाला विलगीकरण कक्षापासून ते थेट कोरोनाच्या मल्टी स्पेशालीटीपर्यंत नेऊन ठेवले आहे. सेव्हन हिल्सच्या या सर्व जडणघडणीत पहिल्यापासून लिलया जबाबदारी पेलणाऱ्या या डॉक्टरचे नाव आहे डॉ. महारुद्र अच्युतराव कुंभार.

असा आहे डॉ. महारुद्र यांचा प्रवास

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात केवळ डॉक्टर म्हणून रुजू झालेल्या डॉ. महारुद्रने आजवर महत्वाच्या जबाबदा-या लिलया पार पाडल्या आहेत. मालाडमधील एम.व्ही.देसाई रुग्णालयात एनआयसीयूची व्यवस्था करण्याची महत्वाची भूमिका पार पाडल्यानंतर, त्यांनी सर्व उपनगरीय रुग्णालयांचे समन्वयक म्हणून काम सांभाळले. पण त्यानंतर त्यांच्यावर आरोग्य विभागाच्या विशेष कार्य अधिकारी (‘ओएसडी’) पदाची जबाबदारी सेापवण्यात आली. पण ही जबाबदारी पार पाडताना वाडिया रुग्णलयातील थकीत रक्कमेबाबतचा तिढा सोडवण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. पण त्यांच्यातील ही कर्तबगारी लक्षात घेत तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी बनवून, हे रुग्णालय महापालिकेच्या ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. हे रुग्णालय तोट्यात गेल्यामुळे थकलेल्या हप्त्याप्रकरणी महापालिकेने ते ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे डॉ. महारुद्र यांनी न्यायालयात महापालिकेची बाजू तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मदतीने समर्थपणे मांडली आणि १५ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निर्णय दिला. हे रुग्णालय महापालिकेच्या ताब्यात आले. आज हेच रुग्णालय कोविड रुग्णांसाठी वरदान ठरताना दिसत आहे.

IMG 20210509 WA0022

(हेही वाचाः लसीकरण केंद्रांवर ऑफलाईन नोंदणीसाठी का होते गर्दी? ही आहेत उत्तरे)

अशी झाली कोविड उपचारांसाठी सेव्हन हिल्सची निवड

सुरुवातीला आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून सुरू केलेले हे रुग्णालय, आज कोरोनाचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय म्हणून ओळखले जात आहे. या रुग्णालयाने इथपर्यंत ओळख निर्माण केली असली, तरी प्रत्यक्षात कोरोनाच्या उपचारासाठी या रुग्णालयाची निवड कशी झाली आणि कोणकोणत्या संकटांचा सामना करावा लागला याबाबत बोलताना डॉ. महारुद्र सांगतात, मी आरोग्य विभागाचा ओएसडी असल्याने तत्कालीन आयुक्त प्रविणसिंह परदेशी, तसेच अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी माझी चर्चा व्हायची. चर्चा करताना कोरोनाचा आजार भारतात आला तर काय व्यवस्था करता येईल, हा विषय निघाला. यावेळी सेव्हन हिल्समध्ये व्यवस्था केली तर, असे म्हणत याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यास सांगितले. त्यानंतर त्याचा फिजिबिलीटी रिपोर्ट करुन बघा, असं काकाणी सरांनी सांगितलं. त्यानंतर १० मार्च २०२० रोजी परदेशी सरांनी याची कल्पना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिली. त्याप्रमाणे विधानसभेत याची घोषणा झाली.

क्वारंटाईन सेंटर ते मल्टीस्पेशालिटी रुग्णालय

१० मार्च २०२० रोजी सकाळी सात वाजताच परदेशी तिथे आले होते. त्यांनी सर्व गोष्टी समजून घेतल्या आणि टप्प्याटप्प्याने यामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले. खंर तर हे रुग्णालय तसं बंदच होतं. २०१५ साली तिथं ३०० खाटांची व्यवस्था होती. पण २०१७-१८ मध्ये केवळ ५० खाटा होत्या. सर्व मशिन्स गंज लागून पडल्या होत्या. त्यामुळे आधी याठिकाणी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला. आपला विश्वास बसणार नाही, पण ४८ तासांमध्ये आम्ही तेव्हा ३०० खाटांची व्यवस्था केली होती. त्यामुळे पहिलं विमान १३ मार्चच्या मध्यरा़त्री आलं. त्या प्रवाशांनी पहिली हजेरी लावल्यानंतर १४ मार्चपासून पूर्ण क्षमतेने प्रवाशांसाठी क्वांरटाईन सेंटर सुरू झालं होतं. आज जरी ते मल्टीस्पेशालिटी रुग्णालय म्हणून ओळखलं जात असलं, तरी त्याची पायाभरणी ही क्वारंटाईन सेंटरपासून सुरू झालेली आहे, असे डॉ. महारुद्र सांगतात.

IMG 20210509 WA0021

(हेही वाचाः नेस्को कोविड सेंटरमधील कर्मचा-यांचे आंदोलन! काय आहे कारण?)

कोरोनाचा पहिला रुग्ण आला आणि…

सेव्हन हिल्स रुग्णालयातील प्रत्येक निर्णय घेण्याकरता १ एप्रिल रोजी सनदी अधिकारी रामास्वामी सरांची नियुक्ती करण्यात आली. तेव्हा आपण लेव्हल आठवर होतो आणि ४२८ रुग्ण दाखल होते. क्वारंटाईनमधून याचे रुपांतर आयसोलेश वॉर्डात केले होते. त्यावेळी कस्तुरबा रुग्णालय पूर्णपणे भरल्याने, तेथील ६० रुग्ण हे सेव्हन हिल्समध्ये दाखल करुन घेण्यात आले होतं. ३० मार्चपासून येथील आयसोलेशन सेंटर सुरू झालं. सेव्हन हिल्समध्ये तसे ५० बेडच होते. पण त्यातील मॅनपॉवर, अॅटॉमॉबी, विद्युत कामे आदी सर्व प्रकारची कामे करणे फारच जिकरीचे होते. परंतु परदेशी सर, काकाणी सर आणि रामास्वामी सरांनी जो विश्वास दाखवला, त्यामुळेच आपल्याला हे काम करता आलं. जेव्हा इथं पहिला पेशंट आला होता, तेव्हा ४०० कामगार सोडून गेले होते. त्यांची पुन्हा समजूत काढून त्यांना परत आणण्यात आलं. त्यांचा जेवणाचा, राहण्याचा प्रश्न सोडवण्यात आला. ज्या नर्स सोडून गेल्या होत्या, त्यांनाही परत आणण्यात आलं. डॉक्टरांना पुन्हा विश्वास देण्यात आला. सेव्हन हिल्सचा जेवढा स्टाफ होता, त्यांना एक महिन्याचा आगाऊ पगार देण्यात आला. त्यामुळे येथील सर्व कर्मचारी वर्ग पुन्हा एकदा उमेदीने काम करू लागला.

असा उभारला ऑक्सिजन प्लांट

महत्वाचा निर्णय रामास्वामी सरांनी घेतला तो म्हणजे आयसीयू बेड बनवायचा. याठिकाणी १५०० खाटांची क्षमता होती. त्यातील ३०० बेड्स हे आयसीयूमध्ये रुपांतरित करण्यात आले, तेही अवघ्या ४५ दिवसांमध्ये. त्यावेळी ब्रिटनमध्ये ऑक्सिजनची समस्या निर्माण झाली. यावर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आयुक्तांनी चर्चा केली. तेव्हा तिथे जो ऑक्सिजन प्लांट आहे त्याचे ऑडिट करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार येथील १०३२ खाटा या ऑक्सिजन प्रणालीमध्ये रुपांतरित करण्यात आल्या. मे महिन्यात येथील ७५० खाटा या ऑक्सिजनच्या केल्या होत्या. पण जून महिन्यात या ऑक्सिजन बेडची क्षमता १२०० एवढी वाढवण्यात आली. जेव्हा ७५० ऑक्सिजन खाटा होत्या. तेव्हा ११ केएलची ऑक्सिजन अतिरिक्त सिंलिडरची टाकी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण अतिरिक्त टाकी बसवून त्याची जोडणी करण्यासाठी चार तासांचे शटडाऊन करण्याची गरज होती. तेव्हा तर ६५० रुग्ण दाखल होते. पाईपलाईनची जोडणी झाली. टाकी बसवली. त्यासाठी मग चार तासांचा बॅकअप घेण्याची गरज होती. म्हणून आम्ही आधी पाच मिनिटांचा शटडाऊन घेतला. तो यशस्वी झाल्यानंतर पुन्हा १५ मिनिटांचा शटडाऊन घेतला. त्यानंतर आम्ही मग ४ तासांचा शटडाऊन घेत, या ऑक्सिजनच्या अतिरिक्त टाकीची जोडणी केली. हा एक वेगळा अनुभव होता. आम्ही त्यावेळी गरज ओळखून टप्प्यात ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध केली. इथूनच मग पुढे कोविड सेंटर बांधताना ऑक्सिजन टँक बांधण्याची संकल्पना अंमलात आणली गेली.

(हेही वाचाः केईएम रुग्णालयातील रुग्णाला रस्त्यावर सोडले! दोन कंत्राटी कामगारांची हकालपट्टी!)

सुमारे ३५ हजार रुग्णांवर उपचार

आज कोणत्याही सहव्याधी असलेल्या किंवा कर्करोग, हृदयविकार तसेच इतर आजार असलेल्या मधुमेही रुग्णांना जर कोरेानाची लागण झाली, तर त्याच्यावर सेव्हन हिल्समध्येच उपचार होतात. याठिकाणी आता केवळ चिंताजनक असलेल्या, विविध आजार असलेल्या रुग्णांनाच दाखल केलं जातं. २४ तास सेवा देणारं हे कोविडचं स्पेशालिटी रुगणालय आहे. आज हे कोरोनाचं मल्टीस्पेशालिटी रुग्णालय म्हणून ओळखलं जातं. आजतागायत याठिकाणी ३३ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. तर १२०० रुग्ण हे क्वारंटाईनमधील होते. ही सर्व आकडेवारी पाहिल्यास सुमारे ३५ हजार रुग्णांवर याठिकाणी उपचार करण्यात आले.

डॉ. महारुद्र नसते तर…

लातूरमधील या तरुणाने एमबीबीएस केल्यांनतर युपीएससी परीक्षा देण्याच्या वेडापायी औरंगाबाद गाठलं. त्यानंतर २००८ मध्ये तो दिल्लीत गेला. युपीएससीच्या परीक्षा देणं सुरुच होतं. पण प्रत्येकवेळी पदरी निराशच पडत होती. अगदी काठावर त्याचं अधिकारी होण्याचं स्वप्न लांब जात होतं. परंतु २०१३ रोजी कुटुंबांची गरज ओळखून, त्यांनी मुंबई महापालिकेच्या डॉक्टर पदाची जाहिरात आल्याने अर्ज भरला आणि महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर म्हणून रुजू झाले. त्यामुळे महारुद्र यांचा हा जन्म केवळ कोरोनावर मात करण्यासाठीच झाला आहे. आज जर ते महापालिकेत नसते, तर सेव्हन हिल्स आपल्याकडे आले नसते आणि सेव्हन हिल्स नसते, तर कोविडच्या रुग्णांवर उपचार करणारे स्पेशालिटी रुग्णालय बनले नसते.

(हेही वाचाः ऑक्सिजन वितरणासाठी नॅशनल टास्क फोर्स बनवा! सर्वोच्च न्यायालयाचा आदेश 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.