मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने यंदाच्या होळीच्या तसेच रंगपंचमीचा सण साजरा करण्यास महापालिकेने मनाई केली आहे. त्यामुळे मनाई केल्यानंतरही जर नागरिकांनी हा सण साजरा केल्यास त्यांच्यावर आपत्ती निवारण कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी जारी केले आहे. मागील वर्षी लॉकडाऊनपूर्वी होळी आणि रंगपंचमीचा सण आला होता. त्यामुळे मागील वर्षी कोरोनाची तेवढी भीती नसली तरी यंदा मात्र या सणावर कोरोनाचे गालबोट लागलेले असून त्यामुळे रंगपंचमीला बुरा न मानो, कोरोना है,असे म्हणत पाण्याने भिजणे आणि रंगवण्यापासून चार पावले दूरच राहून जनतेला हा सण घरातच बसून साजरा करावा लागणार आहे.
(हेही वाचा : मराठी माध्यमातून दहावी शिकले, म्हणून होत नाही ‘त्या’ शिक्षकांची नियुक्ती!)
धुलिवंदन साजरी करण्यास महापालिकेची बंदी
येत्या २८ मार्च रोजी होळीचा सण असून दुसऱ्या दिवशी रंगपंचमी तथा धुलिवंदनाचे सण आहेत. पण कोरोनाचे रुग्ण सध्या मुंबईत झपाट्याने वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मंगळवार, २३ मार्च रोजी परिपत्रक जारी करून होलिकोत्सव व रंगपंचमीचे सण तथा उत्सव सावर्जनिकरित्या साजरा करण्यास मनाई केली आहे. तसेच ‘मी जबाबदार’ मोहिमेअंतर्गत वैयक्तीकसुध्दा शक्यतो हा उत्सव साजरा करणे टाळावे, असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे. मुंबईमध्ये हा सण तथा उत्सव सार्वजनिक ठिकाणी साजरा करण्यास तसेच वैयक्तीक साजरा करण्यास मनाई असतानाही जर कोणी नागरिक या निर्देशाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा आयुक्तांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community