काजू व्यावसायिकांना जीएसटी परतावा  मिळणार  

121

राज्यातील काजू उत्पादकांना १ एप्रिल २०२०  पासून राज्य वस्तू आणि सेवा कराचा (स्टेट जीएसटी) परतावा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला.या निर्णयामुळे कोकण व कोल्हापूरमधील काजू उत्पादक शेतकरी उद्योजकांना फायदा होणार असून, काजूप्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल. मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात काजू व्यावसायिकांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आमदार राजेश पाटील, महाराष्ट्र काजू उत्पादक संघटनेचे अध्यक्ष सुरेश बहुलेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दीपक पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील, चंदगडचे सागर दांडेकर यांच्यासह वित्त, पणन, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोकणच्या अर्थव्यवस्थेला चालना

१ एप्रिल पासून काजू व्यावसायिकांना  राज्य वस्तू व सेवा कराची शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्याचा तसेच मागील कालावधीतील व्हॅट परताव्याची थकित रक्कम परत  मिळेल. या निर्णयाचा फायदा काजू व्यावसायिकांबरोबरच अप्रत्यक्षरित्या काजू उत्पादक शेतकरी, त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांनाही होऊन कोकणच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.

काजूला आधारभूत किंमत

महाराष्ट्रात उत्पादित होणारा काजू उच्च प्रतीचा आणि चांगल्या चवीचा असल्याने त्याला परदेशात मोठी मागणी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काजूसह सुपारी आणि पांढऱ्या कांद्याचे जिओग्राफिकल इंडिकेशन (जी.आय.) करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून या क्षेत्राला मदत करण्याची मागणीही उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केली. कापूस, उसाप्रमाणे काजू पिकालाही आधारभूत विक्री किंमत मिळावी,  अशी मागणी काजू उत्पादक संघटना तसेच शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी बैठकीत केली. त्यावर योग्य विचार करुन निर्णय घेण्याचे आश्वासन उममुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.