विजय वल्लभ अग्नितांडवः तपासात समोर आली रुग्णालयाची हलगर्जी! दोघांना अटक

106

विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला शुक्रवार २३ एप्रिल रोजी पहाटे भीषण आग लागली. या आगीत अतिदक्षता विभागात उपचार घेणा-या 17 रुग्णांपैकी 15 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेत राज्य सरकारने या आगीबाबत चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार आता रुग्णालयाचे चीफ अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर शैलेश पाठक आणि सीईओ दिलीप शहा यांना पोलिसांनी अटक केली आहे. रुग्णालयाचे फायर ऑडिट न केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हलगर्जी समोर आल्याने कारवाई

या दुर्घटनेचा तपास मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा-3 कडे सोपवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात रुग्णालय प्रशासनाची हलगर्जी समोर आल्यामुळे अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात शैलेश पाठक, दिलीप शहा, बस्तीमल शहा आणि रुग्णालयातील इतर डॉक्टर व कर्मचारी यांच्याविरुद्ध निष्काळजीपणा आणि व्यक्तींच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा-3चे पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या नेतृत्त्वाखालील टीमने ही कारवाई केली आहे. एसीचा स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळत आहे.

(हेही वाचाः अजून एक अग्नितांडव! विरार येथील रुग्णालयाला आग… १३ जणांचा मृत्यू)

एक दिवसाची पोलिस कोठडी

या रुग्णालयात कायमच रुग्णांच्या सोयीच्या नावाखाली पैसे उकळले जातात. पण तशी सुविधा मात्र दिली जात नसल्याचे चौकशीत उघड झाल्याचे समजते. जर या रुग्णालयाचे नियमानुसार फायर ऑडिट झाले असते, तर आज त्या 15 निष्पाप रुग्णांचे बळी वाचले असते, असे आता तपासात समोर आले आहे. त्यामुळे आता दोषींना अटक करण्यात आली असून, आज सुट्टीच्या न्यायालयात त्यांना दाखल करण्यात आले. त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर उद्या 2 वाजता त्यांना वसई न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.