मुंबईत पहिली मात्रा अर्थात डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक असून ही संख्या वाढत असतानाच दुसरा डोस घेणाऱ्या जनतेला याचा लाभ मिळत नाही. जर दुसरा डोस दिला गेला तर संबंधित नागरिकांचे दोन डोस पूर्ण होऊन लसवंत होऊ शकतात. त्यामुळे पहिल्या डोसलाच अधिक प्राधान्य दिले जात असल्याने आता महापालिकेने एक दिवस केवळ आणि केवळ दुसरा डोस असलेल्या नागरिकांसाठी लसीकरणची मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शनिवारी ४ सप्टेंबर रोजी संपूर्ण मुंबईतील केंद्रात दुसरा डोस करताच लसीकरण होणार आहे.
पहिल्या मात्रेच्या तुलनेत दुसरी मात्रा घेणाऱ्या लाभार्थ्यांचे प्रमाण कमी
मुंबईसह भारतात कोविड-१९ विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी कोविड-१९ लस उपलब्ध झाली आहे. या अनुषंगाने राष्ट्रीय कोविड – १९ लसीकरण कार्यक्रम अंतर्गत १६ जानेवारी २०२१ पासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरु आहे. या लसीकरण कार्यक्रमामध्ये ०३ सप्टेंबर २०२१ पर्यंत ६९ लाख ६३ हजार २०० लाभार्थ्यांना पहिली मात्रा (डोस) तर २५ लाख ९८ हजार ८८० लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आलेली आहे. या आकडेवारीवरुन पहिल्या मात्रेच्या तुलनेत दुसरी मात्रा घेणाऱ्या लाभार्थ्यांचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास येत आहे.
कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली!
कोविड-१९ विषाणू प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने कोविड लसीचे दोन्ही डोस घेवून लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रावर, शनिवार, ४ सप्टेंबर २०२१ रोजी कोविड-१९ लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे या दिवशी कोविड लसीचा पहिला डोस कोणालाही दिला जाणार नाही. सद्यस्थितीत, कोविड-१९ या आजाराची रुग्ण संख्या काहीशी वाढत आहे. तसेच, कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, कोविड-१९ लसीचा दुसरा डोस (कोविशिल्ड असल्यास पहिल्या डोस नंतर ८४ दिवस आणि कोव्हॅक्सीन असल्यास पहिल्या डोस नंतर २८ दिवस पूर्ण झाल्यास) घेऊन नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. ब्रेक द चेन या अंतर्गत नव्याने सुधारीत तत्वे प्रसारीत करण्यात आलेली आहेत. त्यात सार्वजनिक निर्बंध शिथिल होऊन विविध आस्थापना सुरु झालेल्या आहेत. दोन्ही डोस घेतलेल्या लाभार्थ्यांना उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुसरा डोस देय असणाऱ्या नागरिकांनी सदर सत्राचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community