-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई सार्वजनिक स्वच्छतेबाबत कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही. स्वच्छतेसंदर्भात कारवाईसाठी नेमलेल्या क्लीन अप मार्शल (Clean up Marshals) यांना अधिक सक्रिय करावे. मागील ११ महिन्यांच्या कालावधीमध्ये १ लाख ४० हजार ५८४ नागरिकांकडून ४ कोटी ५४ लाख ५१ हजार ४१२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाईच्या संख्येत वाढ करावी, असे सक्त निर्देश अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. ओला सुका कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या, खुल्या जागेवर कचरा जाळणारे, झाडांच्या पालापाचोळ्याची योग्य विल्हेवाट न लावणारे, जैववैद्यकीय कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट न लावणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा अधिक तीव्र करावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, कामकाजात कसूर केल्याप्रकरणी एफ दक्षिण विभागात कार्यरत संस्थेकडून ३१ लाख ३४ हजार रुपये, आर मध्य विभागातील संस्थेकडून १६ लाख ३ हजार रुपये, तर, आर दक्षिण विभागातील संस्थेकडून १२ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात यावा, असे निर्देशही डॉ. जोशी यांनी दिले आहेत. त्यामुळे या तीन संस्थांकडून सुमारे ६० लाखांचा दंड वसूल केला जाणार असून उर्वरीत तीन संस्थांवरही कारवाई करण्यात येणार असल्याने ही दंडाची रक्कम ६५ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. (Clean up Marshals)
(हेही वाचा – दादरमध्ये १० कोटींच्या एमडी Drugs सह दोघांना अटक)
मुंबई महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि ‘स्वच्छ मुंबई अभियान’ अंतर्गत मुंबईत स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या क्लीन अप मार्शलच्या (Clean up Marshals) संस्थांचे प्रतिनिधी यांची बैठक मुंबई महानगरपालिका मुख्यालयात गुरुवारी २० फेब्रुवारी २०२५) पार पडली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी निर्देश दिले. उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच प्रशासकीय विभाग (वॉर्ड) निहाय प्रत्येकी ३० क्लीन अप मार्शलची नियुक्ती केली असताना काही ठिकाणी त्यापेक्षा कमी संख्येने मार्शल कार्यरत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशाप्रकारे कामात कसूर करणाऱ्या संस्थांविरोधात कठोर व दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देशही जोशी यांनी दिले आहेत. स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी घनकचरा व्यवस्थापन विभाग अहोरात्र कार्यरत आहे. नागरी सहभागातून कचरा संकलनासाठी विविध उपक्रम राबवत आहोत. स्वच्छतेच्या सवयींबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. त्याचबरोबर अस्वच्छता करणाऱ्या, सार्वजनिक उपद्रव करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. (Clean up Marshals)
मागील ४ एप्रिल २०२४ पासून दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ या ११ महिन्यांच्या कालावधीमध्ये अस्वच्छतेस कारणीभूत ठरलेल्या १ लाख ४० हजार ५८४ नागरिकांकडून ४ कोटी ५४ लाख ५१ हजार ४१२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. जोशी यांनी दिली. मात्र, हे प्रमाण तुलनेने नगण्य आहे. प्रत्येक प्रशासकीय विभागात विविध १२ संस्थांच्या मार्फत प्रत्येकी ३० क्लीन अप मार्शलची (Clean up Marshals) नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी संख्येने मार्शल कार्यरत असल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी, उपद्रव करणाऱ्यांविरोधात कारवाईचे प्रमाणही कमी झाले आहे. ही बाब कोणत्याही परिस्थितीत अपेक्षित नाही. त्यामुळे, क्लीन अप मार्शलच्या संस्थांनी तातडीने प्रत्येक विभागात मंजूर ३० क्लीन मार्शल नियुक्त करावेत आणि अस्वच्छतेस कारणीभूत ठरणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी. तसेच ज्या संस्थांविरोधात तक्रारी आहेत. त्यांच्यावरदेखील त्वरित कारवाई करावी, असे निर्देशही डॉ. जोशी यांनी दिले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community