राज्यातील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे! काय म्हणाले मुख्यमंत्री?

सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत, हे जिल्हा व पोलिस प्रशासनाने पाहावे. तसेच नियमांचे पालन न करणा-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

84

गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखवला होता. मात्र आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे. त्यामुळे ब्रेक दि चेन मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलिस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले. आज ते सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलिस अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्य शासनाने दुर्बल घटकातील व गरीब लोकांसाठी जाहीर केलेले आर्थिक सहाय्य व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचावे. तसेच कोणत्याही तक्रारी येणार नाहीत, यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

जम्बो सुविधा तपासा, फायर ऑडिट करा

कोरोना विषाणूचे म्युटेशन आपल्याकडील नमुन्यांमध्ये आढळले आहे. गेल्या वर्षीपेक्षा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, तरुण पिढी जास्त संसर्गित झाली आहे. ऑक्सिजन उपलब्ध करुन घेण्यासाठी आपण युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यांच्या डॉक्टर्सनी बदललेल्या उपचार पद्धतींबाबत नेमकेपणाने काय करायचे, ते राज्याच्या तज्ञ टास्क फोर्सकडून समजून घ्यावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच ऑक्सिजनचा उचित व योग्य वापर तसेच रेमडेसिवीरसंदर्भात काळजीपूर्वक पाऊले उचलावी लागतील. तसेच आपण उभारलेल्या जम्बो सुविधा या येणारा पावसाळा, वादळे लक्षात घेऊन सुरक्षित आहेत किंवा नाही ते तपासून घ्यावे. सर्व रुग्णालयांचे अग्नी सुरक्षा ऑडिट त्वरेने पूर्ण करुन घ्यावे, यात कोणताही निष्काळजीपणा ठेवू नये. सूक्ष्म आणि लहान कंटेन्मेंट क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

(हेही वाचाः मुख्यमंत्र्यांनी पीपीई किट घालून फिरावे, तेव्हाच परिस्थिती कळेल! चंद्रकांत दादांची बोचरी टीका)

नियम तोडणा-यांवर कडक कारवाई करा

जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत. मात्र, याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. विवाह समारंभ हे कोरोना संसर्गास मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचे लक्षात आले आहे. त्यादृष्टीने यावेळेस सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत, हे जिल्हा व पोलिस प्रशासनाने पाहावे. तसेच नियमांचे पालन न करणा-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

ऑक्सिजनचा योग्य वापर करा

राज्याच्या टास्क फोर्सचे डॉक्टर संजय ओक, शशांक जोशी, तात्याराव लहाने यांनी देखील रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर टाळावा. ऑक्सिजन सांभाळून व गरजेप्रमाणेच वापरावा हे सांगितले. एचआरसीटी तपासण्या तसेच प्लाझ्मा वापर याबाबतीतही त्यांनी मार्गदर्शन केले. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, आपण कडक निर्बंध लावले आहेत त्याची चांगली अंमलबजावणी होईल हे पाहताना आपला मुख्य उद्देश हा कोविडची संसर्ग साखळी तोडणे हा आहे. कुठलाही अतिरेक किंवा विसंगत कृती करू नये, कोणतीही  शंका असल्यास मंत्रालयाकडे तातडीने मार्गदर्शन मागावे, असे कुंटे यांनी सांगितले.

(हेही वाचाः फेरीवाल्यांची थट्टा करणारी सरकारी मदत! मुख्यमंत्र्यांच्या पॅकेजनंतर नाराजी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.