-
प्रतिनिधी
लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पाणी वापर हे सूत्र ठरले असून त्यानुसार पाणी वापराचे लेखापरीक्षण करून घ्यावे. पाण्याची गळती रोखण्यासाठी नगरपालिका, महानगरपालिका आणि आणि क्षेत्रीस्तरावर उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शुक्रवारी केली.
जलसंपदा विभागाच्या वतीने १५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. या पंधरवड्याच्या आयोजनासंदर्भात विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी बोलताना विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी, जलसंपदा विभागाशी सर्व यंत्रणा, नागरिक, शेतकरी आणि अन्य घटक जोडले गेले आहेत. त्यामुळे जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मिशन मोडवर काम करावे, अशा सूचना केल्या.
(हेही वाचा – मंगेशकर कुटुंबावर टीका क्लेशदायक व लांच्छनास्पद; खासदार Sunil Tatkare यांची तीव्र प्रतिक्रिया)
या पंधरवड्याच्या माध्यमातून जलसाक्षरतेसाठी विविध उपक्रम राबवून जल व्यवस्थापनावर अधिक भर दिला जावा. लोकाभिमुख कार्यक्रमाच्या माध्यमातून विभागाची वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे, या पद्धतीने जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात यावेत. सिंचन व्यवस्था अधिक प्रभावीपणे होण्यासाठी कालवे प्रवाही राहणे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कालवे दुरुस्ती, कालव्यातून होणारी गळती रोखण्यासाठी जल व्यवस्थापन कृती पंधरवडामध्ये कालव्यांची स्वच्छता करण्यास प्राधान्य देण्यात यावे. या कामात स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, असे विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले.
कालवे स्वच्छ आणि प्रवाही राहिल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन शेवटच्या घटकाला पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे जनसामान्यात राज्य सरकारची प्रतिमा उंचावेल. या कामात स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचाही सहभाग घेऊन जलव्यवस्थापनाच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. तसेच कालव्यांवरील अतिक्रमणे काढण्यासही प्राधान्य देण्यात यावे. जलसंपदा विभागाच्या ताब्यात असणाऱ्या मालमत्तांची मोजणी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. या जागांची ७/१२ वर नोंदणी करून घ्यावी. यासाठी कृती आराखडा तयार करण्यात यावा. जलसंपदा विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम स्वरूपात काम करावे, असे विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी यावेळी सांगितले.
(हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा ७ तारखेला होणार; परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांची मोठी घोषणा)
‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ मध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, शेतकरी, पाणी वापर संस्था संवाद, थकीत पाणीपट्टी वसुली, जल व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग, अनधिकृतपणे पाणी वापर रोखणे, सांडपाण्याचा पुनर्वापर या विषयांना प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (दूरदृश्य प्रणालीद्वारे), जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, मुख्य अभियंता संजीव टाटू उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community