मुंबई पाठोपाठ मुंबई महानगर प्रदेशांत कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. एकाच दिवसांत मुंबईत २ हजार २५५ , ठाणे शहरात ३३४ तर नवी मुंबईत ३९० कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. त्याखालोखाल पनवेल, वसई- विरार, पनवेल, कल्याण-डोंबिवली आणि मीरा-भाईंदर येथेही कोरोनाबाधितांची वाढती संख्या आरोग्य विभागासमोर नवे आव्हान ठरले आहे.
( हेही वाचा : राहुल गांधी यांना होणार अटक?)
शुक्रवारी राज्यात एका दिवसांत ४ हजार १६५ नव्या कोरोना रुग्णांच्या नोंदीमुळे आता राज्यातील विविध भागांत कोरोना रुग्णांची संख्या २१ हजार ७४९ वर पोहोचली आहे. मुंबईत सलग तिस-या दिवशीही कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दोन कोरोनाबाधितांचा मुंबईत तर एकाचा जळगावात मृत्यू झाला. गेले काही दिवस सलग मुंबई, ठाणे, पुण्यासह नागपूरातही बीए व्हेरिएंट ४ आणि ५ पोहोचल्याच्या बातम्या सुरु असताना शुक्रवारी मात्र राज्यात इतर भागांत दोन्ही व्हेरिएंटच्या प्रवेश झाला नसल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालाअंती समजले.
बीए व्हेरिएंटमुळे राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने होणारी वाढ कायम आहे. ३ हजार १६५ नव्या रुग्णांच्या तुलनेत गेल्या २४ तासांत ३ हजार ४७ कोरोना रुग्णांना यशस्वी उपचाराअंती घरी सोडण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९७.८६ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्क्यांवर आहे, कोरोना तपासणी अंती रुग्ण पॉझिटीव्ह होण्याचे प्रमाण ९.७३ टक्क्यांवर आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
जिल्हा – नव्या रुग्णांची संख्या – सक्रीय रुग्णांची संख्या
- मुंबई – २ हजार २५५ – १३ हजार ३०४
- ठाणे – ३३४ (शहर), ८५ (ग्रामीण )- ४ हजार ४४२
- पालघर – २१ – ७०४
- रायगड – ९६ – ७५५
- पुणे – २१५ – १ हजार ५७१
- नागपूर – ३३ – ३२०
- नाशिक – १८ – ११२