गुलाब चक्रीवादळ धडकणार… महाराष्ट्रालाही धोका

राज्यात 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

74

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा तडाखा कायम आहे. ऑक्टोबर महिना उजाडत आला तरी अजूनही राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे. आता बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळाचा धोका संभवत असल्यामुळे, राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वीचं ‘तौक्ते’ चक्रीवादळाने राज्यातील किनारपट्टीच्या जिल्ह्यांना मोठा तडाखा दिला होता.

मुसळधार पावसाचा इशारा

सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा येत्या 12 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आणखी एक चक्रीवादळ आकाराला येत आहे. याचा परिणाम म्हणून शनिवारपासून मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘गुलाब’ चक्रीवादळ

पाकिस्तानकडून या चक्रीवादळाचं नामकरण करण्यात आलं आहे. या चक्रीवादळाला ‘गुलाब’ असं नाव देण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा शनिवारी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 12 तासांत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.