
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईकरांना सकस आणि चांगल्या दर्जाचे मांसमटण मिळावे यासाठी मुंबई महापालिकेच्यावतीने देवनार पशुवधगृहात अर्थात देवनार कत्तलखान्यात जनावरांची कत्तल केली जात असली तरी प्रत्यक्षात मुंबईत शेळ्या, मेंढ्यांची अनधिकृत कत्तल केली जात असल्याने प्रत्यक्षात देवनार कत्तलखान्याचे महत्त्व कमी होत आहे. त्यामुळे मुंबईतील अनधिकृत मटण विक्रेत्यांची संख्या वाढत असून या अनधिकृत मटण विक्रेत्यांवर कारवाई केल्यास देवनार कत्तलखान्याचे महत्त्व वाढून एकप्रकारे चांगल्या दर्जाचे आणि सकस मांस मटण मुंबईकरांना मिळू शकते. त्यामुळे महापालिकेने आपल्या मंडईंमध्येच अनधिकृतपणे शेळ्या, मेंढ्या कापण्यास बंदी आणून देवनारमधूनच याचे वितरण केल्यास अनधिकृत कत्तल थांबून महापालिकेच्या महसूलातही वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. (Deonar Slaughterhouse)
(हेही वाचा – सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी विशेष अभय योजना; DCM Ajit Pawar यांचे विधानसभेत विधेयक सादर)
मुंबई महापालिकेच्यावतीने चालवल्या जाणाऱ्या देवनार पशुवधगृहांमध्ये शेळ्या, मेंढ्या तसेच डुकर आदींचे मांस मटण हे महापालिकेच्या मंडईंमध्ये विक्रीसाठी वितरण केले जात होते. मंडईमध्ये कोणत्याही प्रकारे शेळ्या, मेंढ्या कापण्यास परवानगी दिली जात नसे. प्रत्येक शेळ्या, मेंढ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्या जनावराचे मांसमटण खाण्यास योग्य असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच त्या जनावराचा वध करून त्यांचे मांस शित वाहनांद्वारे महापालिकेच्या मंडईंमध्ये वितरण होते. त्यामुळे महापालिकेच्या मंडईमध्ये कधी शेळ्या तसेच मेंढ्यांची कत्तल होत नव्हती. परंतु महापालिकेच्या मंडईंमध्ये देवनारमधून होणारे मांस मटणाचे वितरण बंद झाल्यानंतर मंडईंमध्ये शेळ्या, मेंढ्या कापल्या जावू लागले, तसेच इतर ठिकाणीही मटणाची दुकाने तयार होवूनही तिथेही या जनावरांची अनधिकृत कत्तल होवू लागली आहे. त्यामुळे जनावरांची अनधिकृत कत्तल थांबवण्यासाठी महापालिकेच्या मंडईंमध्ये शेळ्या,मेंढ्यांचे मांसमटण देवनारमधून वितरण होणे आवश्यक आहे. (Deonar Slaughterhouse)
(हेही वाचा – Disha Salian प्रकरणावरून विधान परिषदेत रणकंदन; सत्ताधारी-विरोधक आक्रमक)
देवनार कत्तलखान्यात दरदिवशी सरासरी दोन ते अडीच हजार शेळ्या, मेंढ्या, दरदिवशी २२५ ते ३०० म्हैस आणि ७५ ते १२५ डुकरांची कत्तल केली जात आहे. आजही या सर्व कत्तलखान्यात कामगार, कर्मचाऱ्यांची ६० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे या देवनार कत्तलखान्याचे आधुनिकीकरण करताना तसेच याचे महत्त्व वाढवण्यासाठी अनधिकृत कत्तलखान्यावर बंदी आणली जावी तसेच त्यावर कारवाई केली जावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार महापालिकेने प्रथम आपल्या मंडईपासून सुरुवात करून मग इतर ठिकाणच्या मटण विक्रेत्यांवर कारवाई करावी. मुंबईकरांना चांगले, सकस मटण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे आणि देवनारमध्ये कत्तल होत असल्याने प्रत्येक अवयवांची शास्त्रोक्त विल्हेवाट लावली जाते. त्यातुलनेत अनधिकृत कत्तलखान्यांमधून कापलेल्या जनावराच्या अवयवांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जात नाही, परिणामी ते उघड्यावर फेकून दिले जात असल्याने भटकी कुत्रे ते खावून अधिक हिस्त्र बनतात असेही काहींचे म्हणणे आहे. (Deonar Slaughterhouse)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community