एफडीएची धडक मोहीम! ‘या’ भागातून रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा जप्त! 

अन्न आणि औषध प्रशासनाने एकूण 2200 रेमडेसिवीरच्या बाटल्या ताब्यात घेतल्या.

96

राज्यभरात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे, त्या तुलनेत उपचार पद्धतीसाठी लागणारा ऑक्सिजनचा साठा तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांचे मृत्यू होऊ लागले आहेत. मागील दोन दिवसांपासून राज्य सरकारने याबाबत झाडाझडती घेतल्यावर पुरवठादारांकडून रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबईतील विविध भागात धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे.

अंधेरीतून २ हजार बाटल्या ताब्यात!

मुंबईसह राज्यभरातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी देखील वाढत आहे. दरम्यान या इंजेक्शनचा साठा आणि काळ्या बाजाराने विकल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे राज्यातील अन्न आणि औषध प्रशासनाने थेट साठेबाजांवर कारवाई करण्याचे धोरण स्वीकारले आहे. अंधेरीतील मरोळमध्ये रेमडेसिवीरचा साठा जप्त करण्यात आला. याठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या दोन हजार बाटल्यांचा साठा ताब्यात घेतला.

(हेही वाचा : रामनवमी कशी साजरी कराल? काय म्हणाले राज्य सरकार? वाचा… )

एकूण २२०० बाटल्या जप्त!

त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने 200 रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा मरिन लाईन्समधून ताब्यात घेतला. अशा रीतीने अन्न आणि औषध प्रशासनाने एकूण 2200 रेमडेसिवीरच्या बाटल्या ताब्यात घेतल्या आहेत.

कोरोना प्रतिबंधात्मक लसींचाही तुटवडा! 

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी खासगी लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागली. 31 खासगी लसीकरण केंद्र बंद आहेत. सोमवारी, १९ एप्रिल रोजी फक्त 35 हजार 309 नागरिकांचेच लसीकरण झाले. त्यातील दहा हजार जणांचे दुसऱ्या डोससह लसीकरण पूर्ण झाले. तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरणात साठा कमी पडल्याने वेग मंदावला. मुंबईत सध्या 129 केंद्र आहेत. पालिकेची 39, राज्य आणि केंद्राची 17आणि खासगी 73 केंद्र आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.