१ ऑगस्टपासून ठाणेकरांना मिळणार ५० एमएलडी अतिरिक्त पाणी

85

येत्या १ ऑगस्ट पासून ठाणे शहरातील नागरिकांना ५० एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याला राज्याच्या जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे विस्तारित ठाणे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाणे जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतली. या वेळी त्यांनी जलसंपदा विभागाला ठाणे शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ठाण्याला अतिरिक्त ५० एमएलडी पाणी देण्याला मंजुरी देण्यात आली आहे.

( हेही वाचा : शिवाजीपार्कमधील तुंबलेल्या पाण्यासाठी रहिवाशांसह अधिकाऱ्यांची कोअर कमिटी )

ठाणेकरांना मिळणार ५० एमएलडी अतिरिक्त पाणी

ठाणे शहराला दररोज ४८५ दशलक्ष मिलिलिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे तो देखील अपुरा पडू लागला होता. मध्य वैतरणा जलाशयाची उंची वाढविल्याने जास्त पाणी अडवणे शक्य होत असल्याने आता ठाणे शहराला १०० एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ठाणे महानगरपालिकेने मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत केली होती. या मागणीला अनुसरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे पाणी तातडीने देण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले होते.

त्यानुसार ठाणे शहराची तातडीची गरज भागवण्यासाठी जलसंपदा विभागाने ५० एमएलडी पाणी येत्या १ ऑगस्ट पासून ठाणे शहराला देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पदग्रहण केल्यानंतर शहराला पहिली मोठी भेट मिळाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.