५५ प्रवाशांना न घेताच विमानाने घेतले टेक-ऑफ! DGCA ने कंपनीला बजावली नोटीस

85

बेंगळुरूच्या केम्पेगौडा विमानतळावर 55 प्रवाशांना न घेताच गो-फस्टच्या फ्लाईटने टेक-ऑफ केल्याची घटना घडली. याप्रकरणी डीजीसीएने विमान कंपनीला नोटीस बजावत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

( हेही वाचा : बेस्टचा डिजिटल प्रवास! लवकरच ‘या’ मार्गांवर धावणार नव्या प्रिमियम बस)

यासंदर्भातील माहितीनुसार सोमवारी 9 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता गो-फस्टचे जी-8-116 हे विमान बेंगळुरूहून नवी दिल्लीला जाणार होते. प्रवाशांच्या सुरक्षा तपासणीनंतर या प्रवाशांना फ्लाईटपर्यंत नेण्यासाठी 4 बसेस पाठवण्यात आल्या होत्या. त्यापैकी पहिल्या 2 बस पुढे गेल्या. त्यातील प्रवासी विमानात बसले. तसेच 2 बसेस 55 प्रवाशांना घेऊन मागाहून येत होत्या. या विमानाचे 55 प्रवासी विमानतळावरील बसने फ्लाईटच्या दिशेने निघाले असतानाच या विमानाने प्रवाशांना न घेता उड्डाण केले. यासंदर्भातील चूक लक्षात येताच एअरलाइन्सने सर्व प्रवाशांना 4 तासांनंतर दुसऱ्या फ्लाइटने दिल्लीला पाठवले.

या घटनेनंतर नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि पीएमओ यांना टॅग करत, अनेक लोकांनी या घटनेबद्दल ट्विटरवर तक्रार केली. उड्डाण सुरू असताना सुमारे 55 प्रवासी बसमध्ये थांबले. या सर्व ट्विटला उत्तर देताना गो-फस्ट एअरलाईन्सने सांगितले की, गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. या 55 प्रवाशांपैकी 53 जणांना दुसऱ्या एअरलाइनद्वारे दिल्लीला पाठवण्यात आले. त्याच वेळी, 2 लोकांनी तिकिटाच्या रकमेचा परतावा मागितला आहे, त्यांचे पैसे परत केल्याचे एअरलाइन्सने सांगितले. या घटनेनंतर डीजीसीएने विमान कंपनीकडे या संपूर्ण घटनाक्रमाचा अहवाल मागितला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.