मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांत चार दिवस अतिवृष्टी… मुख्यमंत्र्यांचा सतर्कतेचा इशारा

74

मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांत ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या चार दिवसांच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या व सर्व जिल्ह्यांच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे. परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरुपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेताना धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि लोलाईन एरियातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक तिथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात कराव्यात, ओएनजीसीसह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती देऊन, सतर्क राहण्यास सांगण्यात यावे असेही ते यावेळी म्हणाले.

पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घ्यावी

या अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षक दल, नौदलाला तयार राहण्याची सूचना करण्यात यावी. किनारपट्टी भागात होणाऱ्या या अतिवृष्टीची माहिती स्थानिक प्रशासनाने नागरिकांनाही द्यावी, या काळात नद्यांचा प्रवाह बदलतो आणि त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरते हे लक्षात घेऊन, प्रशासनाने नागरिकांची काळजी घ्यावी. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेऊन, जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांचा तातडीने आढावा घ्यावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

(हेही वाचाः कोरोनाचे आव्हान कायम, निर्बंध शिथिल नाहीत! काय म्हणाले मुख्यमंत्री?)

लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे

दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे जे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले आहेत, त्याला तातडीने मंजुरी द्यावी. या गावांच्या पुनर्वसनाला लागणारा दीर्घ काळ विचारात घेता, आता तातडीची गरज म्हणून या भागातील लोकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे.

पाणी साचणार नाही याची काळजी घ्या

या काळात मुंबई महानगर प्रदेशात जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे लक्षात घेऊन झाडे पडणे, पाणी साचणे, मॅनहोल उघडे राहणार नाहीत याची काळजी घेणे महत्वाचे आहे. धोकादायक इमारतींमधील नागरिकांना संक्रमण शिबिरात हलवणे गरजेचे आहे. मुंबई शहरात अनेक ठिकाणी विकास कामे सुरू आहेत, या कामाचे डेब्रीज रस्त्यावर आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी, अशा विकास कामांच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचणार नाही, याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यावी.

रुग्णसेवेत अडथळा नको

अतिवृष्टी झाल्यास वीज पुरवठा खंडित होऊ शकतो, त्यामुळे रुग्णालयांनी पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी. जनरेटर्स, डिझेलचा साठा, ऑक्सिजनचा साठा करुन ठेवावा. वीजेचे बॅकअप कशा पद्धतीने घेता येईल याची पर्यायी व्यवस्था करुन, रुग्णसेवेत कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच अतिवृष्टीमुळे कोविड केअर सेंटर्समधील रुग्णांना अडचण होणार नाही, येथे पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याची गरज ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

(हेही वाचाः मुंबईतील पुलाच्या बांधकामात काँग्रेसची आडकाठी)

पावसाळी आजारांकडे दुर्लक्ष नको

कोविड काळात कोविड आणि पावसाळी आजार एकत्र आले, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे पावसाळी आजार उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीवर विशेषत: मलेरियावर नियंत्रण मिळवण्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

मुंबई महापालिकेची तयारी

बैठकीत मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी लहान आणि मोठ्या नाल्यांची केलेल्या स्वच्छतेची कामे, मोठ्या नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण याची माहिती दिली. यावर्षी पाणी साचू शकेल अशा ठिकाणी ४७४ पंप बसवण्यात आले असून, याद्वारे साचलेल्या पाण्याचा निचरा केला जाईल. अतिवृष्टीच्या काळात पूर व्यवस्थापनासाठी ज्युनिअर इंजिनिअर स्पॉटवर राहून, पाणी निचऱ्याचे काम करतील, असेही ते म्हणाले. हिंदमाताच्या परिसरात दोन मोठे टँक केले असून यामध्ये परिसरात साचलेले पाणी वळते करुन, साठवण्याची व्यवस्था केल्याचे ते म्हणाले. त्यांनी पालिका क्षेत्रातील प्रत्येक पोलिस स्टेशनला निधी देऊन स्कॉड तयार केल्याची माहिती दिली. हे स्कॉड त्या वॉर्डमध्ये झाडे पडल्यास, हाय टाईडमुळे अडचणी निर्माण झाल्यास त्याच्या निवारणाचे काम करतील. झाड पडल्यास ते तात्काळ तिथून हटवून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे राहतील, याची काळजी घेण्यात आली आहे. प्रत्येक वॉर्डात मनपाच्या ५ शाळा तयार ठेवल्या असून, गरजेनुसार लोकांना तिथे स्थलांतरित केले जाईल असे सांगितले. एनजीओच्या मदतीने स्थलांतरित लोकांच्या जेवणाची व्यवस्था केल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. लसीचे साठे ज्या शीतगृहात आहेत तिथे पॉवर बॅकअप दिल्याचेही ते म्हणाले. 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.