बळीराजा संकटात! विदर्भ- मराठवाड्यासह राज्यभरात जोरदार पाऊस, या जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा

122

विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात शुक्रवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. विदर्भातील नागपूर, बुलढाणा, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. तर मराठवाड्यातही तब्बल 2 तास संततधार पाऊस बरसला तसेच मराठवाड्यातील जालना आणि छत्रपती संभाजीनगरात पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

( हेही वाचा : देवदर्शन करून पुण्याकडे जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला! लक्झरी बसचा भीषण अपघात, ११ प्रवासी गंभीर जखमी)

गेल्या तीन आठवड्यांपासून मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांचे तापमान कमी झाले आहे. विदर्भातील अकोला शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, बुलढाण्यातील खामगाव आणि चिखली तालुक्यांमध्ये रिमझिम पावसाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहरासह गंगापूर आणि पैठण तालुक्यात वादळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले.

बळीराजा संकटात

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे या तीन जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने पुढील तीन ते चार तासांत वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने राज्यात पुन्हा हजेरी लावल्यामुळे बळीराजा संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.

गारपीटीचा अंदाज

विदर्भ आणि मराठवाड्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागा आणि रब्बी पिकांची नासाडी झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसह गारपीटीचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.