
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
होलिका दहन आणि धुळवड तथा रंगपंचमी हे सण मुंबईकर नागरिकांनी आनंदाने आणि जबाबदारीने साजरे करावेत. होळी सणासाठी नागरिकांनी झाडे अथवा झाडांच्या फांद्या तोडू नयेत. तसेच, रंगांचा उत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घ्यावी. धूलिवंदन/रंगपंचमीकरीता शक्यतो पाण्याचा वापर टाळावा. मुंबई महानगर स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी मुंबईकर नागरिकांनी सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे. (Holi 2025)
गुरूवारी १३ मार्च २०२५ रोजी होळी सण साजरा करण्यात येणार आहे. होलिका दहनासाठी कोरड्या लाकडाचा वापर करून होळी दहन पारंपरिक पद्धतीने साजरे करावे. वृक्षतोड करू नये. रासायनिक घटक वापरुन रंगवलेले लाकूड, प्लास्टिक, रबर, टायर आणि अन्य घातक पदार्थ दहन करताना टाळावे. त्यातून निर्माण होणारा धूर आणि प्रदूषण आरोग्यास हानिकारक असतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. गृहनिर्माण सहकारी संस्था (सोसायटी) आणि स्थानिक समुदायांनी पर्यावरणपूरक पद्धतीने होलिका दहनाचे आयोजन करावे. (Holi 2025)
(हेही वाचा – Legislative Assembly : विवाहित महिलांपुढे प्रश्न; नाव लावायचे कुणाचे? आईचे की नवऱ्याचे की दोघांचे??)
होळी दहनाची परंपरा जपताना पर्यावरणाचे संरक्षण करावे. मुंबईत आपल्या अवतीभोवती असलेली निसर्ग संपदा जोपासणे आणि वृद्धिंगत करणे, हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. आपणा सर्वांना प्राणवायू देणाऱ्या झाडांचे, वृक्षांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (Holi 2025)
होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार, दिनांक १४ मार्च २०२५ रोजी साजरा होणारा ‘धूलिवंदन’हा सण सर्व नागरिकांना एकाच धाग्यात गुंफणारा तसेच नवचैतन्य निर्माण करणारा आहे. मुंबईकर नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासून या दिवशी पाण्याचा अपव्यय टाळावा. पर्यावरणपूरक (Eco-Friendly) नैसर्गिक रंगांचा वापर करावा. त्वचेसाठी सुरक्षित असेलेले आणि मुलांसाठीदेखील निरूपद्रवी असेलेले नैसर्गिक व सेंद्रिय रंग वापरावेत. कृत्रिम रंगांमध्ये रसायने आणि जड धातूंचा अंतर्भाव असल्याने त्यांचा वापर करणे टाळावे. शक्य तितक्या कोरड्या रंगांचा वापर करत पाणी बचत करावी. (Holi 2025)
(हेही वाचा – BMC : महापालिकेच्या रस्ते विभागाच्या कार्यालयासाठीच सल्लागार नेमण्याची आली वेळ)
होलिका दहन आणि धुळवड/रंगपंचमी सणाचा आनंद द्विगुणीत करताना ध्वनी प्रदूषण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. विशेषतः रुग्णालये, निवासी भाग आणि संवेदनशील ठिकाणी आवाज पातळी मर्यादीत ठेवावी, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाकडून समस्त मुंबईवासियांना करण्यात येत आहे. (Holi 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community