राज्यात तातडीने ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करा – हिंदु जनजागृती समिती

100

पालघर जिल्ह्यातील डहाणू जवळील सरावली तलावपाडा येथे ‘ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास तुमचे सर्व दुखणे बंद होईल’, असे सांगत आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.

एका हिंदुत्वनिष्ठ महिलेने गावक-यांच्या साहाय्याने पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी ४ मिशन-यांना अटक केली. पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड या दुर्गम आदिवासी बहुल तालुक्यांत धर्मांतराचे प्रकार अनेक वर्षांपासून चालू आहेत. राज्याची राजधानी मुंबईपासून जवळच असलेल्या पालघर जिल्ह्यात अशा घटना घडणे, हे अत्यंत गंभीर आहे. धर्मांतराची समस्या ही केवळ राज्याची नव्हे, तर देशाची मोठी समस्या आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘धर्मांतर हे राष्ट्रांतरच’ असे म्हटले होते. पुन्हा भारताचे तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर धर्मांतरबंदी व्हायलाच हवी. यासाठी कायदा करण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच गुजरात, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही धर्मांतरबंदी कायदा तातडीने लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉक्टर उदय धुरी यांनी यांनी केली.  हिंदु जनजागृती समितीच्यावतीने पालघर येथील गोविंदराव दादोबा ठाकूर सभागृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या प्रवक्त्या नयना भगत आणि हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक  बळवंत पाठक उपस्थित होते.

हिंदुंना फसवणा-यांवर कारवाई करा

डॉक्टर उदय धुरी पुढे म्हणाले की, यापूर्वीही पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागांत आदिवासी हिंदूंचे धर्मांतर केल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे हिंदू आणि धर्मांतरित हिंदु यांच्यात सण-उत्सव साजरे करण्यावरून वारंवार वाद निर्माण होत आहेत. पोलीस आणि प्रशासन यांनी धर्मांतराचे असे प्रकार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना काढावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनीही केली आहे. ‘लंगडा चालू लागेल’, ‘आंधळ्याला दिसू लागेल’ आदी धादांत खोटा प्रचार करणा-या ‘चंगाई सभां’चा देशभरात सुळसुळाट चालू आहे. या सभांतून गोरगरीब हिंदूंना धर्मांतरित केले जाते. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असूनही, अशा खोट्या चमत्कारांचा प्रसार मिशन-यांनी उघडपणे चालवला आहे. याविषयी राज्यातील अंधश्रद्धा निर्मूलनाचा ठेका घेतलेली अंनिसपण गप्प आहे. तरी असे चमत्कार दाखवून भोळ्या हिंदूंना फसवणा-या पाद्र्यांवर जादूटोणा कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणीही यानिमित्ताने करत असल्याचे धुरी म्हणाले.

( हेही वाचा: शिंदे सरकारविरोधात राष्ट्रवादी दाखल करणार याचिका; निवडणुका वेळेत घेण्याची मागणी )

अहिंदु लोकसंख्येच्या विस्फोटाचा परिणाम देशाच्या धार्मिक संतुलनावर

देशभरात धर्मांतरबंदी कायदा करण्याविषयी आम्ही केंद्र सरकारकडेही यापूर्वीच मागणी केली आहे. आपल्या देशात प्रतीवर्षी 10 लाख हिंदू धर्मांतरीत होत आहेत. नागालँड, मिझोराम, मेघालय, अरूणाचल प्रदेश, मणिपूर ही राज्ये ख्रिस्तीबहुल झाली आहेत. अनेक राज्यांत धर्मांतराच्या घटनांमुळे ख्रिस्ती लोकसंख्या वाढत चालली आहे. भारतात हिंदु नऊ राज्यांमध्ये अल्पसंख्य झाले आहेत. अहिंदु लोकसंख्येच्या विस्फोटाचा परिणाम देशाच्या धार्मिक संतुलनावर होत आहे. आधीच देशात लव्ह-जिहादच्या माध्यमातून हिंदु युवतींच्या धर्मांतराची समस्या ज्वलंत आहे. त्यात ख्रिस्ती धर्मांतरही मोठ्या प्रमाणात चालू आहेत यावर आता नियंत्रण आणायला हवे, असे सनातन संस्थेच्या प्रवक्त्या  नयना भगत यावेळी म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.