आता पश्चिम किनारपट्टीवर नवे संकट! ‘या’ भागांत विजांसह पावसाचा इशारा

केरळ जवळ अरबी समुद्रात पुढच्या 48 तासांच तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.

74

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे आलेल्या पूरपरिस्थितीतून राज्य सावरत असतानाच, आता पश्चिम किनारपट्टीवर अजून एक संकट डोकं वर काढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याने, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यामुळे दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.

विजांसह मुसळधार पावसाची शक्यता 

केरळ जवळ अरबी समुद्रात पुढच्या 48 तासांच तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.

यामुळे 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान दक्षिण कोकण, घाटमाथा व मध्य महाराष्ट्रातील राज्यात काही जिल्ह्यांमध्ये विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्यामुळे विजा चमकत असताना शक्यतो बाहेर जाणे टाळा, असे आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात येत आहे. अशाप्रकराचे तीव्र हवामान दुपारनंतर संध्याकाळी व रात्रीपर्यंत असू शकते, असे सांगण्यात येत आहे.

शाहीनचा राज्याला धोका?

अरबी समुद्रात निर्माण झालेले शाहीन चक्रीवादळ आता ओमान देशाला धडकले असून, ओमानची राजधानी मस्कटमध्ये या वादळाने मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला आहे. तेथील अनेक रस्ते जलमय झाले असून, पूरपरिस्थिती निर्माण झाला आहे. परंतु शाहीन चक्रीवादाळाचा भारताला कुठलाही धोका नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.