केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग ज्योतिर्लिंग जोडणी प्रकल्पांतर्गत राज्यातील ‘खेड – भीमाशंकर’ आणि ‘बनकर फाटा-तळेघर’ या रस्त्यांना नवीन राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी दिली.
( हेही वाचा : ‘गेट वे ऑफ इंडिया’वर कार्यक्रमांसाठी मोजावे लागणार इतके पैसे)
महत्त्वाची शहरे जोडली जाणार
६६ कि.मी. लांबीच्या या नवीन राष्ट्रीय महामार्गामुळे बनकर फाटा, जुन्नर, घोडेगाव, तळेघर ही महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे खेड, आंबेगाव व जुन्नर या तीनही तालुक्यांच्या पर्यटन विकासात वाढ होईल, तसेच परिसरात सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण होण्यास मदत होणार आहे. या दोन्ही रस्त्यांच्या बांधकामविषयक कामाचे नियोजन करून नागरिकांच्या सोयीसाठी महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. महाराष्ट्रातील रस्ते-वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने व पर्यटनाला चालना मिळण्याच्या उद्देशाने महामार्गांच्या निर्मितीसाठी व विकासासाठी केंद्र शासन कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.