तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुलांची शाळा सुरु झाली. सहा तासांच्या शाळेच्या वेळापत्रकात रुळताना मुलांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत असल्याचे दिसून येत आहे. सर्दी, खोकला, तापासारखे आजार बराच काळ मुलांमध्ये आढळून येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दोन वर्षे घरात राहिल्याने मुलांना साधे इन्फेक्शन होत नव्हते. आता बराच काळ खुल्या वातावरणात राहिल्याने सर्दी, खोकल्याचे साधा संसर्गही मुलांच्या शरीराला सहन होत नसल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदवले.
शाळा सुरू झाल्या, पण…
जून महिन्यापासून मुलांच्या शाळा सुरु झाल्याने पालकांना दिलासा मिळाला. आपले मूल आता बाहेर पुन्हा फिरु लागल्याने त्याची शारीरिक आणि मानसिक वाढ होईल, या आशेने पालकही मुलांना उत्सुकतेने शाळा, क्लासेसला पाठवू लागला. परंतु काही महिने सरल्यानंतर मुले सातत्याने आजारी पडू लागली. आजाराचे नेमके कारण समजून घेण्यासाठी चाचण्या केल्या तर कित्येकदा मोठा आजारही निष्पन्न होत नाही, असेही डॉक्टरांना लक्षात आले.
(हेही वाचा आता मुख्यमंत्री शिंदे यांची ‘हिंदू गर्व गर्जना यात्रा’)
रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत झाली…
बालरोग पल्मोनॉलॉजिस्ट डॉ. इंदू खोस्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत जाणारी मुले वातावरणाशी समरस होताना पटकन आजारी पडत आहेत. त्यांना श्वसनाचाही त्रास जाणवत आहे. मुलांना व्हायरल संसर्ग एकामागोमाग एक होत आहे. दोन वर्ष तोंडावर सतत मास्क होता. हात सातत्याने धुतले जायचे. मुलांचा कोरोनापासून बचाव झाला. इतर साधेसुधे संसर्गही मुलांना झाले नाही. मुलांना वर्षभरातून ४ ते ८ वेळा संसर्गाचा त्रास होतो. त्यात सर्दी, खोकला आणि तापाचेही आजार मुलांना होतात. संसर्गामुळे मुलांच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती संसर्गासाठी लढायला तयार होते. परंतु ही प्रक्रिया दोन वर्ष सातत्याने झालीच नाही. साधेसुधे संसर्ग शरीराला झाल्याने मुले प्रौढ होईपर्यंत त्यांचे शरीर संसर्गाशी लढायला आपोआप शिकते.
Join Our WhatsApp Community