कोकण रेल्वे विद्युतवेगाने प्रवास करणार यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र आता ८ महिने झाले तरीही कोकणवासीयांच्या समस्या संपत नाहीयेत.
( हेही वाचा : Shraddha Murder Case : जंगलात सापडलेले नमुने श्रद्धाचेच! वडिलांशी DNA झाला मॅच; पॉलिग्राफ चाचणीत धक्कादायक माहिती उघड)
शुक्रवारी दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने संपूर्ण कोकण रेल्वेची वाहतूक कोडमडली. कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्यांना याचा फटका बसला. शनिवारी मांडवी एक्स्प्रेसही यामुळे उशिरा रवाना झाली. कोकणकन्या, तुतारी, मंगलोर, मांडवी अशा सगळ्या गाड्यांना ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे फटका बसला. बहुतेक सर्वच गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
विद्युतीकरणानंतरही समस्या कायम
कोकण रेल्वेच्या ७४१ किमीच्या मार्गाचे संपूर्ण विद्युतीकरण मार्च २०२२ मध्ये पूर्णत्वास आल्याने कोकण रेल्वेच्या गाड्या विजेवर धावण्यास सज्ज झाल्या. रेल्वेच्या विद्युतीकरणामुळे संपूर्ण कोकणातील प्रवास प्रदुषणमुक्त आणि वेगाने होणार असल्याचे कोकण रेल्वेने म्हटले होते. परंतु वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे आजही गाड्या या जुन्याच इंजिनावर चालवल्या जात आहेत.
एकंदर या विद्युतीकरणाचा कोकण रेल्वेला फायदा झाला नसल्याचे अनेक प्रवाशांचे म्हणणे आहे. सध्या वेगवान गाड्यांना जुने डिझेल इंजिन जोडून गाड्या धावत आहेत. विजेवर चालणाऱ्या इंजिनांची अपुरी संख्या आणि वारंवार होणारे तांत्रिक बिघाड यामुळे कोकणवासीय त्रस्त झाले आहेत.
Join Our WhatsApp Community