राज्यभरात धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधी कायदा करा, वारकरी महाअधिवेशनात ठराव संमत

101

इंग्रजांनी वैदीक सनातन शिक्षण व्यवस्था तोडून मॅकोलेची शिक्षण व्यवस्था चालू केली, त्यामुळे मुली संस्कारहीन बनू लागल्या, मुलींवर चांगले संस्कार केल्यास आणि त्यांना धर्मशिक्षण दिल्यावर त्या सध्या लव्ह जिहादला बाली पडत आहेत, त्यापासून सुरक्षित राहतील, मात्र त्यासाठी हिंदूंनी जातपात न बाळगता हिंदू धर्माविषयी चर्चा करायला हवी, असे मत अमृताश्रम स्वामी महाराज यांनी आळंदी येथे आयोजित वारकरी महाअधिवेशनात मांडले.

आळंदी येथे देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा येथे श्री संत ज्ञानेश्‍वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भव्य राज्यव्यापी 16वे वारकरी महाअधिवेशन’ भावपूर्ण वातावरणात पार पडले. या अधिवेशनात महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा आणि लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यात यावा, गड आणि दुर्ग यांवरील अतिक्रमणे त्वरित हटवावी अशी वारकऱ्यांनी एकमुखी मागणी केली. या महाअधिवेशनात 16 ठराव संमत करण्यात आले.

(हेही वाचा love jihad : राजस्थानातील ‘आफताब’नेही हिंदू युवतीचे तुकडे शेतात पुरले, पण दोन वर्षांनी असे घडले…)

हिंदूंनी स्वतःची ताकद दाखवावी 

या अधिवेशनात बोलतांना ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ म्हणाले की, हिंदूंवरील आघातांच्या विरोधात हिंदू जागृत झाला पाहिजे, गोहत्या बंदी कायदा झालाच पाहिजे. गोरक्षकांच्या पाठीशी उभे राहून हिंदूंनी स्वतःची ताकद दाखवून दिली पाहिजे. द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदासजी महाराज लहवितकर म्हणाले की, कीर्तनकारांनी संप्रदायाची आचारसंहिता बाळगून कीर्तनातून धर्माचे ज्ञान दिले पाहिजे. शालेय अभ्यासक्रमात संत आणि धर्मशास्त्र अभ्यासक्रमाचा समावेश केला पाहिजे. योगीदत्तनाथ महाराज म्हणाले की, कीर्तनकारांनी हिंदू देवता, धर्म आणि वाङमय यांचे शिक्षण देऊन हिंदुंना जागृत करावे. हिंदू देवतांचे विडंबन आणि टीका करणार्‍यांना कडाडून विरोध करावा. कीर्तनातून कीर्तनकरांनी हिंदू धर्म आणि हिंदू यांच्यावर होणार्‍या अत्याचारांची माहिती दिली पाहिजे.

अधिवेशनात कोणते ठराव केले मंजूर?

  • सर्व तीर्थक्षेत्री मद्य आणि मांस विक्रीवर बंदी घालावी.
  • पंढरपूर येथील चंद्रभागा आणि आळंदी येथील इंद्रांयणी नदीत सांडपाणी सोडण्यास बंदी घालावी.
  • सर्व मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त करावीत.
  • बियरबार, मटण दुकानांना देवता आणि गडकोटांची नावे देऊ नयेत.
  • महाराष्ट्रात गोसंवर्धन आयोगाची स्थापना करण्यात यावी.
  • हलाल शिक्का असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार घालावा.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.