कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज केली आहे. संध्याकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली. आजच्या लसीकरणाच्या अंतिम आकडेवारीत वाढ होऊ शकते. ३ एप्रिल रोजी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करुन, महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. आज राज्याने लसीकरणात पाच लाखांचा टप्पा ओलांडल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.
दीड कोटीचा टप्पा ओलांडणार
लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४२ हजार ७१६ नागरिकांचे लसीकरण झाले असून, त्यात आजची संख्या मिळवली तर सुमारे १ कोटी ४८ लाखांच्या आसपास ही संख्या होत आहे. २७ एप्रिलच्या लसीकरणानंतर महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
(हेही वाचाः टेन्शन! कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मिळेना! लसीच्या तुटवड्याने केंद्रे बंद! )
…तर दिवसाला आठ लाखांचा टप्पा गाठता येईल
गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांच्या कितीतरी पटीने महाराष्ट्र लसीकरणात पुढे आहे. २६ एप्रिल पर्यंत राज्यात आतापर्यंतची सर्वाधिक ६ हजार १५५ लसीकरण केंद्रे आहेत. त्यामध्ये ५ हजार ३४७ शासकीय आणि ८०८ खासगी केंद्रांचा समावेश आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी, सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला आठ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. राज्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरुवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३ लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता.
Join Our WhatsApp Community