…तरच मुंबईत चित्रीकरणाला परवानगी

मुंबईतील कोविडबधितांची संख्या नियंत्रणात आली तर मुंबईत चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

79

राज्यात कोविडची दुसरी लाट आल्यानंतर राज्यातील सर्व प्रकारच्या चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता कोविड  रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने, राज्यात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निर्मात्यांनी राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून, चित्रीकरणासाठी सावधानता आणि खबरदारी पाळायची आहे. तसेच ब्रेक दि चेन मधील नव्या वर्गवारी प्रमाणे नियमांचे पालन करावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. येत्या काळात मुंबईतील कोविडबधितांची संख्या नियंत्रणात आली तर मुंबईत चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

निर्मात्यांनी दिले आश्वासन

राज्यभरातील  कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्मात्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी शासन घेत असलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच या संवादात निर्मात्यांनी आपल्या विविध सूचना मांडून एकजुटीने शासन घेईल त्या निर्णयांना पाठिंबा असेल, असे आश्वासन दिले आहे.

(हेही वाचाः मुंबई लोकल सर्वांसाठी बंदच! लेव्हल ३ची बंधने लागू! )

लॉकडाऊन नको आणि नॉकडाऊन नको

राज्यात कोविडचा संसर्ग वाढल्याने गेल्या वर्षी प्रथम लॉकडाऊन करण्यात आला. या वर्षी एप्रिलमध्ये पुन्हा कोविड संसर्ग वाढू लागल्याने लॉकडाऊन करण्यात आला. लॉकडाऊनमुळे सगळेच बंद होते आणि मग चित्रीकरणाचे नॉकडाऊन होते. मात्र, आता आपल्याला हळूहळू अनलॉक करत असताना लॉकडाऊन नको आणि नॉकडाऊन नको, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सोमवारपासून अनलॉक

कोरोनाची दुसरी लाट राज्यात पसरू लागल्याने, सर्व प्रकारच्या चित्रीकरणावर महाराष्ट्र राज्य सरकारने बंदी घातली होती. संपूर्ण राज्यातील सर्वंकष परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून, काही नियम(एसओपी) तयार करण्यात आले आहेत. राज्यात सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

शूटिंगसाठी असे आहेत नियम

ज्या शहरांत, गावांत, जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट हा ५ ते १० टक्क्यांमध्ये आहे, जिथे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडवर उपचार घेणारे पेशंट ४० टक्क्यांहून अधिक आहेत ते सर्वजण लेवल तीनमध्ये येतात. अशा जिल्ह्यांमध्ये मालिका, सिनेमांची चित्रीकरणे केली जाऊ शकतात. परंतु त्यासाठी काटेकोर नियमांचे पालन सक्तीचे आहे. आखून दिलेल्या नियमांमध्ये सर्व चित्रीकरण करणे आवश्यक आहे. चित्रीकरणाशी संबंधित असलेले कलाकार, तंत्रज्ञ, इतर कर्मचाऱ्यांना ‘बायोबबल’ वातावरणातच राहणे बंधनकारक करावे. तसेच अधिकाधिक कलाकारांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात यावा, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

(हेही वाचाः अधिकृत अनलॉकची घोषणा! गोंधळ संपला!)

रविवारी झालेल्या बैठकीत  टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक, टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, के.माधवन, मेघराज राजेभोसले, आदेश बांदेकर, प्रशांत दामले, भरत जाधव, सुबोध भावे, डॉ.अमोल कोल्हे, सिद्धार्थ रॉय कपूर, जे.डी.मजेठिया, अमित बहेल, झी समूहाचे पूनित गोयंका, दीपक राजाध्यक्ष, अजय भाळवणकर,सतीश राजवाडे, निलेश पोतदार, संग्राम शिर्के, विजय केंकरे, शरद पोंक्षे, प्रसाद कांबळी, अनिकेत जोशी, अशोक दुबे, नितीन वैद्य, अशोक पंडित, गौरव बॅनर्जी, मधू भोजवानी, राहुल जोशी, त्याचप्रमाणे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जरहाड, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आदी देखील सहभागी झाले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.