पर्यटन बंद, उपासमारीच्या भीतीने स्थानिक संतप्त

90

महाराष्ट्र सरकारने १० जानेवारीपासून वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर पर्यटन बंदी केल्याने सुरू झालेले पर्यटन व्यवसाय पुन्हा बंद झाले. याचा सर्वाधिक परिणाम स्थानिक रोजगारावर झाला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळे ऐन जानेवारीतच बंद झाल्यामुळे आयोजक, पर्यटक तसेच स्थानिक लोकांचीही निराशा झाली आहे.

स्थानिक रोजगार ठप्प!

नवी मुंबईतील घारापुरी बेट, कोकणातील पर्यटन, अभयारण्य जंगल सफारी पर्यटन बंद करण्यात आले आहे. यामुळे पर्यटक आयोजकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २०२० मध्ये कोरोना लॉकडाऊनमुळे पर्यटनावर निर्बंध आले. आता तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याने नवे आदेश जारी करत पुन्हा एकदा राज्यातील पर्यटन स्थळे बंद केली आहेत. यामुळे कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या छोट्या-मोठ्या टॅक्सी, हॉटेल, ट्रॅव्हल एजंट त्यांच्या कर्मचाऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. यामध्ये सर्वाधिक तोटा स्थानिक जनतेला झाला आहे.

( हेही वाचा : मलाही देशी दारुचा परवाना द्या, विद्यार्थ्याचं थेट शिक्षणमंत्र्याना निवेदन! )

कोकणाला सर्वाधिक तोटा

पर्यटनामुळे स्थानिक जनतेला मोठ्या प्रमाणात फायदा होतो. पर्यटकांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करणे, स्थानिक सामान विकणे, शोभेच्या वस्तूंची विक्री करणे, तसेच काही ठिकाणी स्थानिक लोक घरगुती राहण्याची सोय उपलब्ध करून देतात या सर्व स्थानिकांचा रोजगार ठप्प झाला आहे. सिंधुदुर्गातील समुद्री पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी देश – विदेशातील नागरिकांसह स्थानिक लोकही येत असतात. येथील ग्रामस्थ १०० टक्के या पर्यटकांवर अवलंबून असतात. त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही रोजगाराचे साधन त्यांच्याकडे नाही. त्यामुळे ही बंदी ग्रामस्थांच्या रोजगाराच्या मुळावर आली आहे. पर्यटन बंदीचा सर्वाधिक तोटा कोकणाला झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.