कोरोनाला रोखण्यासाठी आता राज्य सरकार घेणार स्पर्धा

स्पर्धेत सहभागी गावांचे विविध २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार असून, यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय बुधवारी जारी करण्यात येणार आहे.

71

राज्यातल्या ग्रामीण भागातील कोरोना मुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावा, यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच जनतेशी संवाद साधताना, गावच्या वेशीवरच कोरोनाला रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

कोरोनामुक्त गावांना बक्षीसे

  • कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना, अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार.
  • ६ महसुली विभागांत प्रत्येकी ३ प्रमाणे राज्यात एकूण १८ बक्षीसे दिली जाणार. यासाठी बक्षीसांची एकूण रक्कम ५ कोटी ४० लाख रुपये असेल.

(हेही वाचाः आता गावागावात कोविड सेंटर, असे सुरू आहे गावपातळीवर काम)

कोरोनामुक्त गावांना मिळणार विकासकामे

याशिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना लेखाशिर्ष २५१५ व ३०५४ या योजनांमध्ये प्राधान्य देऊन, यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजूर केली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी गावांचे विविध २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार असून, यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय बुधवारी जारी करण्यात येणार आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व गावांनी सहभागी होऊन आपले गाव लवकरात लवकर कोरोनामुक्त करावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

(हेही वाचाः पंतप्रधान मोदींकडून हिवरेबाजारचे कौतुक!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.