मिशन ऑक्सिजन स्वावलंबनातून राज्याला स्वयंपूर्ण करणार

साखर कारखान्यातील ईथेनॉल प्रकल्पात काही फेरबदल करुन विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प कोरोनाविरुद्धच्या लढ्यात अतिशय महत्वाचा आहे.

78

राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी मिशन ऑक्सिजनची अंमलबजावणी सुरू असून, साखर उद्योगाने ऑक्सिजन निर्मितीच्या क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील धाराशिव साखर कारखान्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उदघाटन केले, त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. या कार्यक्रमास केंद्रीय रस्ते विकास आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख-पाटील व्हीसीव्दारे सहभागी झाले.

काय म्हणाले मुख्यमंत्री

कोरोनाविरुद्धचा पहिला लढा तर आपण जिंकला आहे. पहिल्या लाटेत आपण मोठ्या प्रमाणावर टेस्टींग लॅब उभारल्या. कोविड केअर सेंटर उभारली, बेडची क्षमता वाढवली, पण दुसऱ्या लाटेचे आव्हान मोठे आहे. मात्र आता राज्याच्या विविध भागांतून येणारे अहवाल पाहिले असता, आता या लाटेवरही आपण मात करू शकू असा विश्वास मला आहे. पण त्यासाठी आपण ऑक्सिजन निर्मितीमध्ये स्वावलंबी व्हायला हवे. आपल्या राज्यात बाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण होतो. आपली गरज साधारणतः सतराशे मेट्रिक टन आहे, पण आपल्याला तीन हजार मेट्रिक टन निर्मिती करायची आहे. तरच आपण स्वावलंबी होऊ शकू. असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडले. राज्यातील विविध महापालिकांमार्फत ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता सहकार, उद्योग क्षेत्राने यामध्ये पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. साखर कारखान्यातील ईथेनॉल प्रकल्पात काही फेरबदल करुन विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प कोरोनाविरुद्धच्या लढ्यात अतिशय महत्वाचा आहे. यापासून इतर उद्योग आणि सहकारी साखर कारखान्यांनी प्रेरणा घ्यावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

(हेही वाचाः आता राज्यात मिळणार हवेतून शुद्ध ‘ऑक्सिजन’… आरोग्यमंत्र्यांची माहिती)

काय म्हणाले गडकरी?

ऑक्सिजन निर्मितीसाठी डिस्टलरी बंद केली जाऊ नये. पन्नासहून आधिक बेड असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प अनिवार्य करावा. प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक असणारा ऑक्सिजन त्या जिल्ह्यातच निर्माण होईल, यावर भर द्यावा, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, धाराशिव कारखान्याने उभारलेला प्रकल्प या संकटात अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील गरज पूर्ण होईल. त्याचबरोबर इतर काही जिल्ह्यांत पुरवठा केला जाऊ शकतो. इतर कारखान्यांनी अशा प्रकारे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करावेत.  कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असणारी परवानगी आणि नियमावलीत बदल करण्याबाबत संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करावी. यामुळे ऑक्सिजन निर्मिती करण्याची प्रक्रिया आधिक गतिमान होईल.

प्रकल्पाबाबत थोडक्यात

•उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पात बदल करुन ऑक्सिजन प्रकल्पात रुपांतर.
•ऑक्सिजन निर्मिती करणारा पहिला साखर कारखाना.
•दररोज सहा टन ऑक्सिजनची निर्मिती होणार.
•ऑक्सिजनची शुद्धता 96 टक्के.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.