इंधन आणि वेळेच्या बचतीसाठी मेट्रो हा सर्वोत्तम पर्याय – मुख्यमंत्री शिंदे

102

मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासह इंधन आणि प्रवाशांच्या वेळेची बचत होण्यासाठी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत मेट्रो हा उत्तम पर्याय आहे. मेट्रोबाबत लोकांच्या मनात विश्वास असून, शून्य विलंब हे या सेवेचे यश आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी, १५ आॅगस्ट रोजी काढले.

डहाणूकरवाडी ते दहिसर दरम्यानच्या मेट्रो सेवेला हिरवा झेंडा 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मेट्रो २ अ’  मार्गावरील सुशोभिकरण केलेल्या मेट्रो डब्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे अनावरण करण्यात आले. डहाणूकरवाडी ते दहिसर (पूर्व) दरम्यानच्या अतिरिक्त मेट्रो सेवेलाही मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून पुढील प्रवासासाठी रवाना केले. या वेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास उपस्थित होते.

(हेही वाचा भारतीय नौदलाकडून आगळीवेगळी सलामी! शूरवीरांनी उरणच्या समुद्रात फडकवला तिरंगा)

एकही गाडी विलंबाने धावली नाही

मुख्यमंत्री म्हणाले, एप्रिलमध्ये सुरु झालेल्या ‘मेट्रो २ अ’ या मार्गिकेवरुन ३८ लाख प्रवाशांनी सुखकरपणे प्रवास केला आहे. आजपर्यंत एकही गाडी विलंबाने धावली नाही किंवा मेट्रो रद्द झालेली नाही. आता मेट्रोची वारंवारिता वाढल्याने प्रवाशांचा सुखकर प्रवास होईल. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात मेट्रोची विविध कामे प्रगतीपथावर असून, एक-एक टप्पा पुढे जातो आहे. त्यामुळे प्रवाशांचा आरामदायी, सुखकर प्रवास व्हावा, यासाठी मेट्रोने अधिक दर्जेदार गुणवत्तापूर्ण सेवा देण्याबरोबरच आगामी प्रकल्पही वेळेआधी पूर्ण करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.

दोन मेट्रो मार्गिकांचा लवकरच विस्तार

शून्य विलंब (झीरो डिले) आणि शून्य रद्दीकरण (झिरो कॅन्सलेशन) या पद्धतीने सध्या मेट्रो गाड्या धावत आहेत. मेट्रोची विश्वासार्हता सुधारली असून, या अतिरिक्त गाड्यांमुळे सेवेची वारंवारिता १० मिनिटांवर येईल. दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मेट्रो २ अ अंधेरी पश्चिमेपर्यंत आणि मार्गिका ७ गुंदवलीपर्यंत विस्तारित केली जाईल. याचा लाखो प्रवाशांना लाभ होईल, अशी माहिती महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.