मुंबईकरांची सकाळ थंड वा-यांची ठरली!

98

कधी उन्हाळा, कधी पावसाळा तर रात्री भेटीला येणारे गार वारे या तिन्ही ऋतुमानाने वैतागलेल्या मुंबईकरांची सोमवार गार वा-यांची ठरली. मुंबईत पहिल्यांदाच किमान पारा २० अंश सेल्सिअसवर उतरला. त्यामुळे मुंबईकरांना थंडीची अलगद चाहूल अनुभवता आली.

थंडीची हलकीशी चाहूल लागली

खासकरुन प्रभात फेरीकारांसाठी सोमवारची सकाळ पहिल्यांदाच थंडीची हलकीशी जाणीव करुन देणारी होती. गेल्या काही दिवसांपासून मेघगर्जना, विजांचा कडकडाट असा वातावरणात बदल दिसतोय. ऐन नोव्हेंबर महिन्याच्या शेवटचा आठवडा आल्यानंतरही किमान तापमान २६ तर कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअवरवर नोंदवले जात होते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात थंडीची अलगद होणारी सुरुवात लांबतेय, याची जाणीव होत होती. अवकाळी पावसानं राज्यभरात बरेच दिवस बस्तान बसवल्यानं थंडीसाठी पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी बराच वेळ गेला. अखेर सोमवारी पहिल्यांदाच पा-याने डुबकी मारत किमान तापमान २० अंश सेल्सिअसवर नोंदवलं गेलं. मात्र येत्या दोन दिवसांत किमान आणि कमाल तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारी संध्याकाळी पुन्हा मेघगर्जनेसह हलका पाऊस होईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवला आहे.

पुढील दोन दिवसांसाठी अंदाज 

  • ३० नोव्हेंबर – कमाल तापमान ३५ व किमान २२ अंश सेल्सिअसवर नोंदवलं जाईल. आकाश ढगाळ राहील.
  • १ डिसेंबर – कमाल तापमान ३५ तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअवर नोंदवलं जाईल. संध्याकाळी मेघगर्जनेसह पाऊस राहील.

 ( हेही वाचा: महिलाच करतात नव-याकडून होणा-या मारहाणीचे समर्थन )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.