डोंगर दऱ्यातून जाण्यास रेल्वे गाड्या तयार! पावसाळी कामे झाली पूर्ण!

80

महाराष्ट्रातून लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या धावतात, तेव्हा त्या डोंगर दऱ्यातून मार्गक्रमण करत जात असतात. अशा वेळी दरड कोसळणे हा पावसाळ्यातील अपघात नेहमीचा झालेला आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होत असते, म्हणून पावसाळ्याआधी या डोंगरदऱ्यातील कामे पूर्ण करण्याचे आव्हान रेल्वेसमोर असते. यंदाच्या वर्षी रेल्वेने ही कामे सुरु केली आहेत. खंडाळा घाटातील तब्बल ४०० धोकादायक दरड काढून टाकण्यात आल्या आहेत, तर २०० दरड कसारा घाटातून काढून टाकण्यात आल्या आहेत. जानेवारी महिन्यापासून या कामाला सुरुवात झाली आहे. मार्चच्या मध्यापर्यंत अर्धे काम पूर्ण झाले आहे. आधी धोकादायक ठिकाणे शोधणे, त्यानंतर तेथील दगड काढणे, अशा स्वरूपाचे हे काम असणार आहे. यातील किमान ४० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार आहे.

(हेही वाचा : ‘ऑनलाईन’ व्यवहार करताना ‘फसवणूक’ कशी टाळाल? वाचा सविस्तर माहिती)

ड्रोन कॅमेऱ्यांचाही वापर!

खंडाळा घाट हा ५८ बोगद्यांचा २८ किमी लांबीचा आहे. तर कसारा घाट हा १८ बोगद्यांचा १४ किमी लांबीचा आहे. पावसाळ्यात दगड कोसळून अपघात होणे हे नित्याचे झाले आहे. अशा अपघातापासून संरक्षण व्हावे म्हणून मध्य रेल्वे लोखंडाचा वापर करून बोगद्यांची उभारणी केली आहे. तसेच ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्याचबरोबर गँगमन नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय अपघातांची माहिती मिळावी म्हणून ड्रोन कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. सध्या घाटाच्या मार्गांवरील १९ धोकादायक ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

१८६० साली बांधलेला रेल्वे मार्ग!

२०१९मध्ये खंडाळा घाटात दरड कोसळून येथील रेल्वे मार्ग खंडित झाला होता. त्यावेळी ओव्हरहेड वायर तुटली होती, विद्युत खांबही तुटले होते. सह्याद्री रांगावरील हा रेल्वे मार्ग सर्वात जुना आहे. १८६० साली येथील रेल्वे मार्ग बांधण्यात आला आहे. पहिल्या दिवसांपासून रेल्वे घाटातील धोकादायक दरड बाजूला करण्याचे काम रेल्वे करत आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.