…तर तीव्र आंदोलन करणार, एसटी कर्मचा-यांचा इशारा !

98

मागच्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचारी राज्यात विलीनीकरण व्हावे म्हणून, आंदोलन करत आहेत. यासाठी नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. 22 फेब्रुवारीला या अहवालावर सुनावणी होणार आहे. समितीने दिलेला अहवाल जर नकारात्मक असेल, तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एसटी कर्मचा-यांनी दिला आहे.

22 फेब्रुवारीला एसटीच्या विलीनीकरणाचा निर्णय देण्यात येणार असून त्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी मुंबई आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात जमा होण्याची शक्यता आहे. या आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत येणा-या आंदोलकांना थांबवून समुपदेशन करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांकडून देण्यात आले आहेत.

mumbai

सुरक्षेत वाढ

या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यया खाजगी आणि सरकारी निवासस्थानाचीही  सुरक्षा वाढवण्यात येणार असल्याचं समोर आलं आहे. मंत्रालय, मातोश्री बंगला,  वर्षा बंगला तसेच सह्याद्री अतिथीगृहाबाहेर सुरक्षा वाढवण्यात येणार आहे.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

एसटीच्या अहवालावर 22 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणी वेळी एसटी कर्मचारी मुंबईत जमण्याची शक्यता आहे. सर्व एसटी कर्माचा-यांना मुंबईच्या वेशीवर थांबवण्याची पोलिसांकडून आता जोरदार तयारी सुरु आहे.

( हेही वाचा: एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणार ?)

काय निर्णय होणार?

गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेलं एसटी कर्मचा-यांचं आंदोलन संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. एसटीचे राज्यात विलीनीकरण करण्यासाठी कर्मचारी ठाम आहेत, तर एकीकडे न्यायालयाने हा संपच बेकायदेशीर ठरवला आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर अहवाल काय सांगतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.