मुंबईतील पाणीबाणी वाढली; दिवसभर राहणार काही भागात पाणी बंद

139
भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४,००० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे. तसेच भांडुप संकुलाशी संबंधित असलेल्या विविध जल वाहिन्यांवर २ ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणे आणि २ ठिकाणी उद्भवलेली गळती दुरुस्त करणे इत्यादी कामे केली जाणार आहेत. त्यामुळे ३० जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून ते ३१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० पर्यंत मुंबईतील १२ विभागात पाणी पुरवठा बंद राहील व तर दोन विभागात २५ टक्के पाणी कपात केली जाणार असे जाहीर केले होते. परंतु हे काम वाढल्याने आता मंगळवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्यातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार,  ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०:०० पासून ते दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०:०० पर्यंत भांडुप संकुल येथील जल शुद्धीकरण केंद्रास पर्यायी ४००० मिमी व्यासाची जल वाहिनी जोडणे २४०० व १२०० मिमी व्यासाच्या झडपा बसविणे, गळती दुरुस्ती करणे आणि इतर संलग्न कामे हाती घेण्यात आली होती.
या सर्व कामांसाठी भांडुप संकुल येथील १,९१० दश लक्ष लीटर प्रति दिन क्षमतेचे जल शुद्धीकरण केंद्र सुमारे ४२ वर्षानंतर प्रथमच २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते. ही सर्व कामे पूर्ण करीत असताना त्या दरम्यान बऱ्याच तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे उपरोक्त कामे पूर्ण करून १,९१० दश लक्ष लीटर प्रति दिन क्षमतेचे जल शुद्धीकरण केंद्र, केंद्रापर्यंत येणाऱ्या व केंद्रापासून पुढे जाणाऱ्या सर्व जल वाहिन्या पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी ८ तासांचा अतिरिक्त कालावधी लागणार आहे.
त्यामुळे, पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे उपरोक्त कामामुळे बाधित झालेल्या भागांचा पाणी पुरवठा मंगळवारी ३१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता पूर्वपदावर न येता तो संध्याकाळी ०६:०० पासून पूर्वपदावर येणे अपेक्षित आहे. तरी सर्व संबंधितांनी व नागरिकांनी कृपया याची नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.