जून महिन्यातच पवई तलाव भरला!

पवई तलाव गेल्या वर्षी ०५ जुलै २०२० रोजी पहाटे ६ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला होता.

88

एरव्ही पावसाळा सुरू झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात भरून वाहणारा पवई तलाव यावर्षी २४ दिवस आधीच वाहू लागला. मुंबईतील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव शनिवारी १२ जून २०२१ रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला आहे. हाच तलाव गेल्या वर्षी ०५ जुलै २०२० रोजी पहाटे ६ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला होता.

(हेही वाचा : नाल्यात ग्रील बसवण्याचा महापालिकेला पडला विसर!)

५४५ कोटी लिटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते. गेल्या काही दिवसांत या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा तलाव आहे.

तलावामध्ये ५४५.५ कोटी लिटर पाणी असते!

या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लिटर (५,४५५ दशलक्ष लिटर) पाणी असते. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.