गोवंडीत दुमजली घर कोसळले, ३ ठार! मुंबईत घरे पडण्याची मालिका सुरूच!

78

मागील ४ दिवसांपासून मुंबईत पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. त्यामुळे मुंबईत आणि परिसरात दरडी कोसळल्याने मोठ्या संख्येने जीवित हानी झाली, ही संकटांची मालिका अद्याप कमी होताना दिसत नाही, आता गोवंडी येथे एक घर कोसळल्याने त्याखाली ३ जणांचा मृत्यू झाला आणि ७ जण जखमी झाले आहेत.

अंधारामुळे मदत कार्याला आले अडथळे!

या दुर्घटनेतील जखमींवर घाटकोपरच्या राजावाडी आणि सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी, २३ जुलै रोजी पहाटे ५ वाजता ही दुर्घटना घडली. गोवंडीच्या शिवाजीनगरमधील बॉम्बे सिटी हॉस्पिटलजवळ ही दुर्घटना घडली. पहाटे सर्वजण साखर झोपेत असताना हे दुमजली घर कोसळले. त्यामुळे परिसरात एकच हाहाकार उडाला. घर कोसळण्याचा आवाज आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या आक्रोशामुळे जागे झालेल्या शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ मदतकार्यास सुरुवात केली. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनाही तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली. मात्र, पाऊस आणि अंधारामुळे मदत कार्यात व्यत्यय येत होता. तसेच हे घर दाटीवाटीच्या भागात असल्यानेही मदतकार्यात अडथळा येत होता.

दुर्घटनेतील मृतांची नावे

नेहा परवेज शेख, वय ३५, मोकर झबीर शेख, वय ८०, शमशाद शेख, वय ४०,

जखमींची नावे

परवेज शेख, वय ५०, अमिनाबी शेख, वय ६०, अमोल धडाई, वय ३८, समोल सिंग, वय २५, मोहम्मद फैजल कुरेशी, वय २१, नामरा कुरेशी, वय १७, शाहीना कुरेशी, वय २६

या वर्षी झालेल्या दुर्घटना 

मालवणीत इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू

९ जून रोजी रात्री उशिरा मालवणीत गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण गंभीर जखमी झाले.

बेहरामपाड्यात इमारतीचा भाग कोसळला

पावसाळ्याला सुरुवात होताच मुंबईत इमारती कोसळू लागल्या. ७ जून रोजी वांद्र्यातील बहिराम पाड्यातील ४ मजली इमारतीचा एक भाग कोसळून १ जणाचा मृत्यू झाला होता. ही इमारत बेकायदेशीर होती. त्याठिकाणी बचावकार्याला अडचणी येत होत्या.

मुंबईत २ ठिकाणी ३७ जणांचा मृत्यू

रविवारी, १८ जुलै रोजी विक्रोळी येथे दरड कोसळल्याने २५ जणांचा, तर चेंबूरच्या वाशी नाका येथील भारतनगर येथे भिंत कोसळल्याने १२ जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनांचे सत्र सोमवारी, १९ जुलै रोजीही सुरूच होते. ठाणे येथे दरड कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.