जोगेश्वरीत नवीन डॉप्लर रडार; हवामानाचा आणखी अचूक अंदाज येणार! 

जोगेश्वरी येथे बसवण्यात येत असलेल्या डॉप्लर रडारमुळे उपनगर भागातील हवामानात थोडासाही बदल तात्काळ लक्षात येणार आहे, असे मुंबई येथील विभागीय हवामान खात्याचे प्रमुख डॉ. जयंत सरकार म्हणाले.

69

मुंबईच्या उपनगर भागातही हवामानाचा अचूक अंदाज यावा, यासाठी हवामान खाते तातडीने जोगेश्वरी येथील वेरावली येथे दुसरा डॉप्लर रडार बसवण्याची तयार करत आहे. हा डॉप्लर मागील २ दिवसांत बसवण्यात आला आहे. तसेच यासंबंधी उर्वरित कामे पूर्ण करून लवकरच तो कार्यान्वित करण्यात येणार आहे, असे मुंबई विभागीय हवामान खात्याचे प्रमुख डॉ. जयंत सरकार यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ शी बोलताना सांगितले.

मुंबई उपनगराच्या हवामानाचा अंदाज येणार!

मुंबईत २६ जुलै २००५ साली अचानक काही तासांत ९४४ मीमी इतका पाऊस पडला आणि अवघी मुंबापुरी पाण्याखाली गेली होती, तेव्हापासून धडा घेऊन राज्य सरकारने तातडीने हवामानाचा पूर्वानुमान यावा, याकरता विदेशी तंत्रज्ञानाचा उपयोग करून कुलाबा येथे डॉप्लर रडार बसवला. मात्र तरीही मुंबईचा भौगोलिक परिसर पाहता उपनगरातील हवामान बदलाचा अचूक अंदाज यावा यासाठी मुंबईसाठी आणखी एक डॉप्लर रडार बसवण्याची आवश्यकता होती, त्यामुळे  जोगेश्वरीमध्ये हा डॉप्लर रडार बसवण्यात आला आहे. यामुळे उपनगर भागातील हवामानात थोडासा बदल तात्काळ लक्षात येणार आहे, हा डॉप्लर रडार कुलाबा येथे बसवण्यात आलेल्या रडारपेक्षाही अधिक आधुनिक असणार आहे, असे डॉ. जयंत सरकार म्हणाले. २०२० मध्ये हवामान खाते ४ डॉप्लर रडार आणण्याचा निर्णय घेतला, त्यातील २ रडार मुंबई येथे पाठवण्यात आले, त्यातील एक जोगेश्वरीच्या बसवण्यात आले असून दुसरे नवी मुंबईत बसवण्यात येणार आहे.

(हेही वाचा : ‘द वीक’ची शरणागती! म्हणाले, वीर सावरकर ‘सर्वश्रेष्ठ’!)

हवामानाचा अंदाज सांगणारे डॉप्लर रडार असे काम करते?

  • डॉप्लर रडार ही पावसाची खात्रीशीर माहिती देणारी आपत्कालीन यंत्रणा आहे.
  • अचूक हवामान माहिती देण्यासाठी तिचा वापर जगभर सर्रासपणे केला जातो.
  • डॉप्लर रडार विद्युत चुंबकीय लहरी ढगावर सोडते. ढगांकडून परतणाऱ्या लहरी ढगाची ‘एक्स रे’प्रमाणे इत्थंभूत माहिती आणतात.
  • डॉप्लर रडार ढग सरकत असतानाही अचूक माहिती देते. डॉप्लर रडारच्या साहाय्याने पावसाची, ढगफुटीची, गारपिटीची माहिती सहा ते चार तास आधी मिळू शकते.
  • २५० किलोमीटरपर्यंतच्या परीघात पाऊस, गारपीट किंवा ढगफुटी कोठे कोठे होणार, हे किमान एकतास आधी १०० टक्के खात्रीपूर्वच अचूक सांगता येते.
  • परतीचा पाऊस असो कि अवकाळी पाऊस कोठे आणि किती होईल याची माहिती मिळते. त्यामुळे प्रशासनाला आपत्कालीन अलर्ट देणे शक्‍य होते आणि जीवित तसेच वित्तहानी टाळणे खात्रीने शक्य होते.
  • समुद्रकिनाऱ्यांवर, तसेच पर्वतीय परिसरातील संभाव्य पाऊस, चक्री वादळे, हिमवृष्टी, उष्म्याची लाट, हवामानातील अचानक बदल, ढगफुटीमुळे अतिवृष्टी, बर्फवृष्टी, धुलीकणांचे वादळ किंवा इतर वादळे होणार असतील, तर त्याचा अंदाज खूप आधीच येऊ शकतो.
  • त्या शहर, गाव, खेड्यातील हवामान खाते आपत्ती व्यवस्थापनास याची पूर्व कल्पना देऊन, संबंधित शहर अथवा गाव-खेड्यात येणाऱ्या प्रलयंकारी पाऊस, वादळ, पुरापासून मनुष्य आणि वित्त हानी टाळू शकते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.