बोरीवलीतील ‘त्या’ पुलाचे काम आता अजून रखडण्याची शक्यता

हा प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी फेटाळून दप्तरी दाखल केला.

115

बोरीवली पश्चिम येथील आर.एम. भट्टड मार्ग व एस.व्ही.रोडवरील जंक्शन, तसेच कल्पना चावला चौक याठिकाणी बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचा विस्तार करण्यात येत आहे. यासाठीचा खर्च १६१ कोटी रुपयांवरुन आता ६५१ कोटींवर पोहोचला आहे. मात्र, चार ते पाच पट अधिक वाढलेल्या या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळून लावला आहे. कंत्राटदाराला वाढीव काम न देता यासाठी नवीन निविदा काढून हे काम दिले जावे, अशी सूचना करत स्थायी समितीने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. त्यामुळे बोरीवलीतील सध्या सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम रखडले जाण्याची दाट शक्यता आहे.

रखडले आहे काम

बोरीवली पश्चिम येथील आर.एम. भट्टड मार्ग व एस. व्ही. रोड या जंक्शनवर आणि कल्पना चावला चौक याठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय २५ सप्टेंबर २०१८ रोजी घेण्यात आला. त्यामुळे स्थायी समितीच्या मान्यतेने एम.ई.पी.एल- स्पेको या संयुक्त भागीदारातील कंपनीला विविध करांसह १६१ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. या पुलाच्या बांधकामाला १५ नोव्हेंबर २०१८ रोजी सुरुवात झाली. त्यामुळे हे काम पावसाळा वगळून २४ महिन्यांमध्ये पूर्ण करणे अपेक्षित होते.

(हेही वाचाः मुंबईतील एका उड्डाणपुलाने चढली कोट्यावधींची ‘शिडी’)

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बांधकाम

बोरीवली पूर्व व पश्चिम जोडणाऱ्या जनरल करिअप्पा पूल ते पश्चिम द्रुतगती महामार्ग यांना जोाडणाऱ्या विकास नियोजित रस्त्यावर सुमारे १३५ बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून करिअप्पा उड्डाणपूलाच्या पूर्वेकडील उतार ते पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम पुढे वाढवण्यात आले आहे. त्यामुळे पश्चिमेकडील लिंक रोडवरील पश्चिम द्रुतगती महामार्ग यांना जोडणारी मुक्त मार्गिका तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

असा वाढला खर्च

या पुलाचे काम सुरू झाल्यानंतर आयएस कोडमध्ये नवीन सुधारणा लागू झाल्यामुळे, या पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बेअरींगमध्ये सुधार करणे अत्यावश्यक होते. तसेच कामाच्या ठिकाणी काही स्पॅनच्या लांबीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या बांधकामांच्या खर्चामध्ये वाढ झाली. त्यामुळे विविध करांसह १६१ कोटींच्या मूळ कंत्राट कामांमध्ये अतिरिक्त वाढ होत, हा खर्च ६५१ कोटींवर जाऊन पोहोचला आहे.

(हेही वाचाः नालेसफाईच्या नावावरून मुंबईकरांना कितीदा मूर्ख बनवाल!)

म्हणून फेटाळला प्रस्ताव

याबाबतचा प्रस्ताव मागील स्थायी समितीच्या सभेपुढे आला असता, एवढ्या मोठ्या प्रमाणात कंत्राट रक्कमेतील वाढ लक्षात घेता याला समिती सदस्यांनी तीव्र विरोध केला. महापालिकेच्या परिपत्रकानुसार एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हेरीएशन देता येत नसून, हे प्रमाण सुमारे ४०० टक्के जास्त आहे.त्यामुळे हे नियमाला धरुन नसल्याचा आक्षेप सदस्यांनी नोंदवला. त्यानंतर हा प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी फेटाळून दप्तरी दाखल केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.