मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मोबदल्यात घर न मिळता पैसे देण्याचा निर्णय मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ने घेतला आहे. १५९व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून किमान २५ ते ४० लाख रुपये मोबदल्याच्या रूपात देण्यात येणार आहे.
मेट्रो मार्गिका, सागरी सेतू, कोस्टल रोड, खाडी पूल, रस्ते विस्तारीकरण आदी कामांमध्ये MMRDA चा पुढाकार आहे. या कामांमध्ये अनेकदा भूसंपादन करावे लागते. त्यात नागरिकांच्या जमिनी जातात. काही वेळा थेट जमिनी गेल्या नाहीत, तरीही अन्य कारणांनी नागरिकांचे आर्थिक नुकसान होते किंवा त्यांना विस्थापित व्हावे लागते. अशा सर्व प्रकल्पग्रस्तांना आत्तापर्यंत एमएमआरडीएकडून (MMRDA) मोबदल्याच्या रूपात सदनिका द्याव्या लागत होत्या. मात्र मुंबईसारख्या ठिकाणी प्रकल्पस्थळीच घरे उपलब्ध होणे अनेकदा अवघड होते. यामुळे आता एकरकमी रोख मोबदला देण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.
हा निर्णय यापुढील प्रकल्पग्रस्तांना मिळेल. त्यामध्ये प्रामुख्याने बांधकामाच्या जलद गतीवर असलेल्या ‘शिवडी-वरळी कनेक्टर’ या सेतूच्या प्रकल्पग्रस्तांचा समावेश आहे. त्यांना या निर्णयाचा सर्वांत आधी लाभ मिळेल. याखेरीज उत्तर-विरार सागरी किनारा मार्ग, ठाणे-बोरिवली बोगदा, ऑरेंज गेट-मरिन ड्राइव्ह भुयारी मार्ग, आगामी काळातील गायमुख-मिरा भाईंदर, मिरा भाईंदर-विरार, बदलापूर-कांजुरमार्ग या मेट्रो मार्गिकांशी निगडीत ६,३००हून अधिक प्रकल्पबाधितांचा समावेश असेल. प्राधिकरणाचा हा निर्णय मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन घडवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. (MMRDA)
Join Our WhatsApp Community