गड-दुर्ग रक्षण महामोर्च्याचा IMPACT: तीन महिन्यांत स्वतंत्र ‘महाराष्ट्र गड-दुर्ग महामंडळा’ची होणार स्थापना

137

स्वराज्याचे रक्षण आणि स्वधर्म वाचवण्यासाठी पाच मोगल पातशाह्यांशी प्राण पणाला लावून छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवलेले शेकडो गड-दुर्ग आता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. ती अतिक्रमणे काढून त्यांचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आझाद मैदान येथे ‘महाराष्ट्र गड दुर्ग रक्षण समिती’च्या वतीने महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाचा परिणाम म्हणून स्वतः पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आझाद मैदान येथे महामोर्च्याला भेट देऊन पुढील तीन महिन्यांत स्वतंत्र ‘महाराष्ट्र गड-दुर्ग महामंडळा’ची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा केली.

समय मर्यादेत अतिक्रमणे हटवणार 

पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, आपण इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊनच आलो आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या ३ महिन्यांतच महाराष्ट्रातील सर्व गड-दुर्गांचे जतन, संवर्धन, रक्षण आणि त्यावरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी स्वतंत्र ‘महाराष्ट्र गड-दुर्ग महामंडळा’ची स्थापना करण्यात येणार आहे. समय मर्यादेत गडांवरील अतिक्रमण हटवण्यात येतील. जसे प्रतापगडावरील सगळी अतिक्रमणे हटवण्यात आली, तसे इतर गड-दुर्गांवरील अतिक्रमणे हटवण्यात येणार आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर याविषयावर तातडीने विशेष बैठक बोलावण्यात येईल. त्यावेळी महाराष्ट्र गड दुर्ग रक्षण समितीलाही निमंत्रित करण्यात येईल, असे मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.

(हेही वाचा गड-दुर्गांच्या रक्षणासाठी शिवरायांचे मावळे पुन्हा आझाद मैदानात एकवटले)

शिवरायांचा मावळा म्हणून विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग  

शुक्रवारी, ३ मार्च रोजी दुपारी १२ वाजता मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान अशा काढण्यात आलेल्या या मोर्च्यामध्ये महाराष्ट्रभरातून शेकडो गड दुर्गप्रेमी संघटना, छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचे वंशज, विविध संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना, शिवप्रेमी व धर्मप्रेमी नागरिक शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मुखात छत्रपती शिवरायांचा जयघोष, डोक्यावर भगव्या टोप्या, हातात भगवे झेंडे, मागण्यांचे फलक, तुतारी, मावळ्यांच्या वेशात महामोर्च्यात सहभागी झालेल्या गड-दुर्गप्रेमींनी गड दुर्गाच्या रक्षणासाठी शासनाला आणि जनतेला आर्त साद घातली. प्रत्येकाने ‘शिवरायांचा एक मावळा’ म्हणून मोर्च्यात सहभाग घेतला. नुकतेच प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाच्या कबरीभोवती मोठ्या प्रमाणात केलेले अतिक्रमण हटविण्याची विद्यमान शिंदे फडणवीस सरकारने धाडसी कृती केली; मात्र बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणाऱ्या कोल्हापूरातील विशाळगडावर १०० हून अधिक अनधिकृत आरसीसी बांधकामे झाल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. अशाच प्रकारे रायगड, लोहगड, कुलाबा, बंदनगड, दुर्गाडी किल्ला यांसह राज्यातील महत्त्वाच्या ३५ गड-दुर्गांवर अवैधपणे घरे, कबरी, दर्गे, मशिदी आणि अन्य विविध प्रकारची अतिक्रमणे झालेली आहेत.

(हेही वाचा गडकिल्ल्यांवरील इस्लामिक अतिक्रमण हे अधार्मिकच – रणजित सावरकर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.