‘कोरोना सोबत जगताना ‘एसएमएस’ ही त्रिसूत्री महत्त्वाची

115

कोरोना उपचाराबाबत राज्य शासनाने सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून विविध निर्णय घेतले आहेत. कोरोना सोबत जगताना ‘एसएमएस’ ही त्रिसूत्री महत्त्वाची असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. “सध्या आपल्याकडे करोनावर प्रतिबंधक लस नाही. लस येईपर्यंत किती महिने लागतील, सांगता येत नाही. लॉकडाऊन करत राहिलो तर आपल्या अर्थव्यवस्थेचे काय होईल? ज्यांचे हातावर पोट आहे त्याचे काय होईल? बिझनेस हाऊसेस, व्यवसाय बंद होतील,” असेही ते म्हणाले. दूरदर्शनवरील ‘कोरोनाशी दोन हात’ या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी स्पष्ट सांगितलं आहे की, हे वर्ष नफा-नुकसानीचा विचार करायचे नाही. हे वर्ष फक्त जगण्यासाठी आपण जगायला हवे. हे करीत असताना आपल्याला एसएमएस (एस म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, एम म्हणजे मास्क, एस म्हणजे सॅनिटायजर म्हणजेच सॅनिटाईज्ड हॅण्डस्.) पद्धतीने जगावे लागेल,” असे टोपे म्हणाले.

अनावश्यक गोष्टी टाळाव्या

मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक’ याप्रमाणे सगळ्याच गोष्टींवर मनाचा ब्रेक लावणे गरजेचे आहे. म्हणजेच अनावश्यक ठिकाणी जायचे टाळले पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांनी, कोमॉर्बीड लोकांनी गर्दीत जाणे टाळावे. सध्या शाळा उघडल्या नाहीत, सतर्कता म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी पुन्हा सुरू करत नाही. पण एसएमएस पद्धतीचा वापर करून जरूर आपले कार्य करावे आणि जेवढे टाळता येऊ शकत असेल त्या अनावश्यक गोष्टी जरूर टाळाव्यात, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

शिक्षण सुरू

शाळा सध्या बंद असल्या तरी शिक्षण चालू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट फोन ज्यांच्याकडे आहे ते लोक ऑनलाइन स्कुलिंग करू शकतात. जिल्हा परिषदेच्या शाळेत ऑनलाइन स्कूलिंग सर्वत्र अजून चालू नाही. काही अडचणी आहेत. ऑनलाइन स्कूलिंग १०० टक्के परिणामकारक आहे असे मला वाटत नाही आणि हे आपल्याला कायमस्वरूपी ऑनलाइन ठेवता येणार नाही. त्यामुळे लस येईपर्यंत हे असेच सुरू ठेवावे लागणार असल्याचेही ते म्हणाले. मुलांचे नुकसान निश्चितच होऊ नये. त्यांचे वर्ष वाया जाता कामा नये. जो काही गॅप पडला आहे, तो भरून काढण्यासाठी शिक्षणाची पद्धत असो, शिकवण्याची पद्धत असो किंवा कंटेन्टमध्ये बदल करायचे असोत, शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षण थांबता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यावीच लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना’ सुरू

“राज्यात ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना’ सुरू आहे त्यामध्ये. १००० रुग्णालये आहेत, ज्यामध्ये आपण १०० टक्के कॅशलेस सेवा, एक रुपया न घेता या सगळ्या सुविधा देऊ शकतो. राज्य सरकारचा एकच फोकस राहिलेला आहे की, सामान्य माणूस हा आमच्या डोळ्यासमोर आहे, सामान्य गरीब रुग्ण डोळ्यासमोर आहे आणि त्याचे हित आपल्याला कसे जपता येऊ शकेल ते जपण्याच्या दृष्टीकोनातूनची धोरणे आखण्यात आलेली आहेत,” असेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.