रॉयल वेस्टर्न टर्फ क्लबकडून हमी पत्र देण्यास टाळाटाळ: ‘रेसकोर्स’ थकीत रकमेच्या वसुलीचे मार्ग बंद

95

महालक्ष्मी रेसकोर्सची जागेचा भाडेकरार संपुष्टात येवून ९ वर्षे उलटल्यानंतरही शासनाच्यावतीने ना ही जागा ताब्यात घेतली जात ना या भाडेकराराचे नुतनीकरण केले जात. त्यामुळे महापालिकेला मिळणारे कोट्यवधी रुपयांचे शुल्क थकले जात असताना नगरविकास खात्याने रॉयल वेस्टर्न टर्फ क्लब कडून हमी पत्र लिहून घेत जुन्याच दराने पैसे घेण्याच्या सूचना केल्या. परंतु रॉयल वेस्टर्न टर्फ क्लबकडून हमी पत्र लिहून देण्यास टाळाटाळ करत असल्याने महापालिकेला मिळणाऱ्या सुमारे ६० कोटी रुपयांच्या महसूल मिळवण्याचा मार्गही तात्पुरती बंद झाला आहे. त्यामुळे सरकार आता यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महालक्ष्मी रेसकोर्सची जागा ताब्यात घेण्याचा ठराव महापालिका सभागृहाने केल्यानंतरही भाडेकरार संपुष्टात येवून ९ वर्षे पूर्ण होत आली तरी हा भूखंड सरकार आणि महापालिकेला ताब्यात घेता आलेला नाही. भाडेकरार संपुष्टात आल्यानंतर राज्यात तीन मुख्यमंत्री विराजमान झाले. परंतु करार संपुष्टात आल्यानंतरही राज्यातील शिंदे सरकारला रॉयल वेस्टर्न टर्फ क्लबला बाहेरचा रस्ता दाखवण्याची हिंमत दाखवता आलेली नाही. रॉयल टर्फ क्लबने भाडेकरार संपल्यानंतरही आपले वार्षिक भाडे घ्यावे म्हणून महापालिकेकडे तगादा लावला आहे, परंतु भाडेकराराचे नुतनीकरण न झाल्याने महापालिका भाडे स्वीकारत नाही.

दरम्यान, सरकारने या रेसकोर्सची जागा ताब्यात घेण्याबाबतची पुढील कार्यवाही केली नसली तरी भाडेकरार नसल्याने महापालिकेला भाड्याची रक्कम वसूल करण्यात येणारी अडचण लक्षात घेता नगरविकास खात्याने रेसकोर्सची जागा भाडेकरारावर दिलेल्या रॉयल वेस्टर्न टर्फ क्लबकडून हमीपत्र लिहून घेत शासनाच्या पुढील निर्णयासापेक्षा भाड्याची थकीत रक्कम वसूल करण्याचे पत्र पाठवले असल्याची माहिती मिळत आहे. महापालिकेला जुन्या दराने भाडेकराराची रक्कम भरल्यानंतर कराराचे नुतनीकरण झाले असे गृहीत धरता येणार नाही, ते नुतनीकरण ठरणार नसून थकीत रक्कम आपण केवळ देत आहोत अशाप्रकारे हमी पत्र रॉयल वेस्टर्न टर्फ क्लबकडून घेण्याच्या सूचना नगरविकास खात्याने पाठवलेल्या पत्रात केल्या होत्या. परंतु अशाप्रकारचे हमी पत्रच रॉयल वेस्टर्न टर्फ क्लबकडून महापालिकेला लिहून दिले जात नाही. त्यामुळे २०१३पासूनचे जुन्या दरानुसार भाडे वसूल करण्याचे मार्गच पुन्हा एकदा बंद झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे आता महापालिका पुन्हा एकदा राज्य शासनाकडे पत्र व्यवहार करुन पुढील कार्यवाहीच्या सूचना करण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.