-
ऋजुता लुकतुके
मध्यमवर्गीयांना दिलासा देणारी एक महत्त्वाची बातमी म्हणजे देशाचा किरकोळ महागाई दर हा ७ महिन्यांत पहिल्यांदाच ४ टक्क्यांच्या खाली ३.६१ टक्क्यांवर स्थिरावला आहे. कोरोनानंतर सतत वाढणाऱ्या महागाईला ५ टक्क्यांच्या आत काबूत ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला खूप प्रयत्न करावे लागत होते. पण, यंदा चांगला मान्सून आणि उत्पादन क्षेत्रात झालेली वाढ यामुळे महागाई दर आटोक्यात राहिला आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात हा दर ३.६० टक्क्यांवर होता. त्यानंतर पहिल्यांदाच तो ४ टक्क्यांच्या खाली आला आहे. रिझर्व्ह बँकेसाठीही ही एक दिलासादायक गोष्ट आहे. कारण, अलीकडेच बँकेनं ४ वर्षांनंतर रेपोदर ०.२५ टक्क्यांनी कमी केला होता. दर कपातीचं धोरण कायम राखण्याचीच मध्यवर्ती बँकेची इच्छा आहे. महागाई आटोक्यात असेल तर दर कपातीचं धोरण राबवणं बँकेला आता शक्य होईल. (Retail Inflation Rate)
(हेही वाचा – महाराष्ट्र ही नवी स्टार्टअप राजधानी; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे विधान)
त्यामुळे महागाई दर ४ टक्क्यांच्या खाली आल्यानं पुन्हा एकदा रेपो रेट कमी होण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे. आरबीआयने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी महागाई दर ४.२ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. रायन्सेस प्रायवेट लिमिटेडचे एमडी आणि सीईओ संजय कुमार यांनी सीपीआय महागाई निर्देशांक ५ टक्क्यांच्या खाली आला आहे, असं म्हटलं. खाद्य पदार्थातील किमती घटल्यानं ही स्थिती पाहायला मिळतेयं. खाद्य पदार्थाच्या किमतीवरील नियंत्रण कायम ठेवून विक्री वाढवण्याचा प्रयत्न आहे. किरकोळ महागाई दर ४ टक्क्यांपर्यंत असल्याने व्याज दरात कपात शक्य असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Retail Inflation Rate)
(हेही वाचा – IPL 2025 : दुखापतग्रस्त राहुल द्रविड अखेर राजस्थान रॉयल्समध्ये दाखल)
किरकोळ महागाई दर मोजण्यासाठी सरकारने २९९ प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा समावेश केला आहे. यामध्ये अन्नपदार्थ, कपडे, इंधन, घरांच्या किमती यांचा समावेश आहे. केंद्र सरकारचे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय या गोष्टींच्या किमतींचा आढावा घेते आणि त्या आधारावर महागाई दराचे आकडे वेळोवेळी सादर करते. हा दर महिन्याला आणि दरवर्षी सादर केला जातो. महागाई वाढण्याची काही प्रमुख कारणे आहेत. त्यामध्ये जर वस्तू आणि सेवेची उपलब्धता कमी होऊन मागणी वाढल्यास त्याचा परिणाम किंमतीवर होतो आणि किंमत वाढते ती वस्तू महाग होते. एखाद्या वस्तूच्या कच्च्या मालाची किंमत वाढली, कामगार शुल्क इत्यादींमध्ये वाढ झाल्यास किंमत वाढ होते. भारतात खाद्यपदार्थांच्या किमती हा महागाई वाढण्यामागचा मोठा घटक आहे. (Retail Inflation Rate)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community