हिंदू स्वतःच स्वतःचे धर्मांतर करून घेतात! मोहन भागवतांचे महत्वपूर्ण विधान

हिंदू कुटुंबांनी हिंदू धर्माचा अभिमान बाळगला पाहिजे, स्वधर्मातील परंपरा जपलेल्या पाहिजेत, मूल्य शिक्षण दिले पाहिजे, असे मोहन भागवत म्हणाले. 

81

हिंदू धर्मीय छोट्याशा स्वार्थापोटी धर्मांतर करून घेतात, हा स्वार्थ म्हणजे विवाह! विवाहासाठी हिंदू स्वतःचे इतर धर्मात धर्मांतर करून घेतात, त्यामुळे हिंदू कुटुंबांनी स्वधर्माचा अभिमान बाळगण्याची आवश्यकता आहे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. उत्तराखंड येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

स्वधर्माचा अभिमान बाळगा! 

हिंदू कुटुंबांनी हिंदू धर्माचा अभिमान बाळगला पाहिजे, स्वधर्मातील परंपरा जपलेल्या पाहिजेत, मूल्य शिक्षण दिले पाहिजे, असे सांगत धर्मांतर कसे काय होते? आपल्या देशातील मुले, मुली इतर धर्मात कसे काय जातात? छोट्या छोट्या स्वार्थांसाठी, लग्न करण्यासाठी धर्मांतर करतात, हे चुकीचे आहे, हा मुद्दा वेगळा आहे. पण आपण आपली मुले तयार करत नाही, असेही भागवत म्हणाले.

संघाच्या कार्यक्रमात ५० टक्के महिला दिसाव्यात!

मोहन भागवत यांनी यावेळी संघाच्या कार्यक्रमांमध्ये फक्त पुरुषच दिसतात हा मुद्दाही उपस्थित केला. हिंदू समाज संघटित करणे हाच आरएसएसचा मुख्य हेतू आहे. पण जेव्हा आम्ही आरएसएसचे कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा आम्हाला फक्त पुरुषच दिसतात. जर संपूर्ण समाज संघटित करायचा असेल तर यामध्ये ५० टक्के महिला असल्या पाहिजेत, असेही भागवत यांनी म्हटले.

मुलांकडे लक्ष द्या! 

ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्व काही पहायला मिळते. आपणच मुलांना घरात काय पहायला हवे आणि काय नको हे शिकवण्याची गरज आहे, लोकांना आपले गुलाम बनवण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी चीनमध्ये ओपियम पाठवले. तरुण त्याच्या आहारी गेले आणि पाश्चिमात्य देशांनी चीनवर राज्य केले. आपल्या देशातही हेच सुरु आहे. जेव्हा तुम्ही ड्रग्ज प्रकरणे पाहता आणि ते कुठून येतात हे पाहिले तर ते का, कशासाठी येत आहेत आणि याचा कोणाला फायदा होत आहे हे तुम्हाला समजेल, असेही भागवत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.