Sarvajanik Ganeshotsav : मंडळांच्या मंडप परवानगीबाबत समन्वय समिती नाखूश

309
Sarvajanik Ganeshotsav : मंडळांच्या मंडप परवानगीबाबत समन्वय समिती नाखूश

मुंबई महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडप उभारणीसाठी जो निर्णय आणि निर्देश १ ऑगस्ट रोजी प्रसारित केले आहेत, त्यातील अटी व शर्तींशी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समिती सहमत नाही. महापालिकेच्या अटींनुसार सलग ५ वर्षासाठी गणेश मंडळांना मंडप उभारण्यासाठी जी परवानगी देण्यात येणार आहे, ती गतवर्षी मुख्यमंत्र्यांनी २५,५०,७५ वर्ष झालेल्या गणेश मंडळांना सरसकट कोणत्याही अटी शर्ती शिवाय ३ वर्षाची सलग मंडप उभारणीसाठी परवानगी देण्याचे जाहीर केले होते, त्याशी सुसंगत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेने आपल्या अटी व शर्तीचा पुन्हा एकवार विचार करून राज्याचे मुख्यमंत्री यांनी गतवर्षी जाहीर केलेल्या निर्णयाशी अधीन राहून व कोणत्याही अटी व शर्ती न टाकता सर्वच गणेश मंडळांना (Sarvajanik Ganeshotsav) सरसकट ३ अथवा ५ वर्षासाठी सरसकट मंडप परवानगी द्यावी अशी मागणी वजा सूचना समन्वय समितीने केली आहे.

(हेही वाचा – Ganeshotsav 2024 : गणेशोत्सव मंडळांना येत्या ६ ऑगस्टपासून ऑनलाईन परवानगी, मंडप उभारणीसाठी १०० रुपयांचे शुल्क)

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा श्री गणेशोत्सव (Sarvajanik Ganeshotsav) साजरा करण्यात येत आहे. मुंबई महानगराची सांस्कृतिक ओळख असणारा श्री गणेशोत्सव ७ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होत आहे. हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी महानगरपालिका सातत्याने विविध स्तरिय प्रयत्न करित आहे. यंदा महानगरपालिका प्रशासनाने उत्सवादरम्यान विविध स्तुत्य उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून उत्कृष्ट काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना यावर्षीपासून सलग पाच वर्षांसाठी परवानगी देण्यात येणार आहे. याबाबत बृहन्मंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीचे ऍड नरेश दहिबावकर यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांना पत्र पाठवूनही या निर्णयातील अटी व शर्तीबाबत प्रश्न उपस्थित केले आहे.

या पत्रांत समन्वय समितीने असे म्हटले आहे की, महापालिकेने घातलेल्या अटी व शर्तीचा विचार केल्यास मुंबईतील थोड्या फार मंडळांना त्याचा फायदा होईल. पाच वर्षासाठी मंडप उभारण्यासाठी सलग परवानगी देताना, मागील दहा वर्षे शासन नियम व कायद्याचे पालन करण्याऱ्या मंडळासाठी एकदाच परवानगी देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही असे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहे. जर मागील दहा वर्षाचा विचार केल्यास दोन वर्षे कोरोना मध्ये गेली, त्यावेळी काही मंडळांना परवानगीसाठी बाहेर पडता आले नाही तसेच बॅनर, मंडपासाठी, खड्डे, ध्वनी प्रदूषण पर्यावरण याबाबत पालिकेने व शासनाने जेवेळोवेळी नियम घातले होते, याचे स्मरण समन्वय समितीने करून दिले आहे.

(हेही वाचा – Ganeshotsav : चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी एसटीचे आरक्षण सुरू)

या नियमाच्या अनुषंगाने गणेश मंडळ सलग पाच वर्षासाठी सरसकट परवानगी शिवाय वंचित राहणार आहे. बहुतेक मंडळे ही महापालिका व शासन यांनी घातलेल्या नियमाच्या कचाट्यात अडकणार आहेत तसेच पालिकेने पाच वर्षांसाठी सलग परवानगी मिळाल्यानंतर, प्रत्येक वर्षी पोलीस व वाहतूक विभागाची परवानगीची अट सुद्धा घातली आहे. यामुळे दरवर्षी गणेश मंडळांना पालिका, पोलीस वाहतूक इत्यादी प्राधिकरणाकडे हेलपाटे घालावे लागणार आहे, मग आपण जी सूट देत आहात त्यात व नियमित परवानगी यात फरक काय असा सवाल ऍड. नरेश दहिबावकर यांनी केला आहे.

उत्कृष्ट काम करणाऱ्या मंडळांना सलग पाच वर्षाची परवानगी देण्यात येणार आहे. उत्कृष्ट काम म्हणजे काय हे स्पष्ट करणे आवश्यक असे नमुद करून समन्वय समितीने कृत्रिम तलावात गणेश विसर्जनाची जी अट घातलेली आहे. याचा विचार करता मागील वर्षीच्या कृत्रिम तलावाची संख्या ही फार कमी होती, यंदाच्या वर्षी कृत्रिम तलावाची संख्या वाढवणार आहात का अशी विचारणा केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव (Sarvajanik Ganeshotsav) मंडळे ही दरवर्षी पारंपारिक पद्धतीने गिरगाव, दादर, जुहू, माहीम इत्यादी चौपाटीच्या ठिकाणी विसर्जन करतात. त्याला आपणाकडून बंदी असणार आहे का याबाबतही काही स्पष्टता नाही असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.