
-
प्रतिनिधी
येत्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रात नववर्षाची सुरुवात होत असताना राज्यातील प्रत्येक व्यावसायिक वाहनावर लिहिण्यात येणारे सामाजिक संदेश, जाहिराती आणि प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत लिहिणे अनिवार्य करण्यात येणार आहे. असे स्पष्ट निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.
याबाबत माहिती देताना मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले, “मराठी ही महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा असून, राज्यातील बहुतांश नागरिक मराठी भाषिक आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी राज्य शासनावर आहे.”
राज्यात नोंदणीकृत असलेल्या अनेक व्यावसायिक वाहनांवर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यांसारखे सामाजिक संदेश हिंदी किंवा अन्य भाषेत लिहिले जातात. यामुळे मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारावर मर्यादा येतात. त्यामुळे यापुढे ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ यांसारखे संदेश थेट मराठीत लिहिण्याचे बंधन असणार आहे.
(हेही वाचा – Vidya – Sapno Ki Udan चित्रपटाचा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात विशेष प्रिमियर शो)
गुढीपाडव्यापासून अंमलबजावणी
“येत्या गुढीपाडव्यापासून (३० मार्च २०२५) या निर्णयाची अंमलबजावणी सुरु होईल,” असेही सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी स्पष्ट केले. राज्यात नोंदणीकृत असलेल्या सर्व व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश, जाहिराती आणि प्रबोधनात्मक माहिती फक्त मराठीत असावी. याबाबत परिवहन आयुक्तांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले, “मराठी भाषेच्या गौरवासाठी आणि जनजागृती अधिक प्रभावी होण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. यामुळे मराठी भाषेला योग्य तो मान मिळेल आणि राज्यातील जनतेपर्यंत सामाजिक संदेश प्रभावीपणे पोहोचेल.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community