१०वी आणि १२वीच्या परीक्षांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! कधी होणार परीक्षा? वाचा…

१०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य हे सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने राज्य सरकारकडून या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

91

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्यात १ली ते ९वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आणि ११वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत, राज्य सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आता या परीक्षा मे आणि जूनमध्ये घेण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. १०वी आणि १२वी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आधीच परीक्षेचा ताण आणि त्यातच वाढती रुग्णसंख्या हा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे अशा तणावपूर्ण परिस्थितीत परीक्षा कशी द्यायची हा सर्वांसमोर प्रश्न आहे. त्यामुळेच परीक्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सोमवारी चर्चा करण्यात आली. या चर्चेत १०वी आणि १२वीच्या परीक्षांबाबत राज्य शासनाने काही निर्णय घेतले आहेत. १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य हे सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने राज्य सरकारकडून या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत दिली. लवकरच याबाबतचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

कधी होणार परीक्षा?

१०वीची परीक्षा ही साधारणपणे जून महिन्यात तर १२वीची परीक्षा ही मे महिन्याच्या शेवटी घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. तसेच राज्यातील सर्व शिक्षण मंडळांना(सीबीएसई, आयसीएसई, आयबी, कॅम्ब्रिज बोर्ड्स) राज्य सरकारचा हा निर्णय स्वीकारण्याबाबत विनंती करणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.