मार्सेलिस पराक्रमाची १११ वर्षे : संपूर्ण जगात गाजली ‘ती’ ऐतिहासिक उडी!

स्वातंत्र्यवीर सावरकर एक अलौकिक व्यक्तिमत्व, सशस्त्र क्रांतीचे प्रेरणास्रोत होते. पूर्वापार चालत आलेल्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, अस्पृश्यता यांविरोधात त्यांनी समाजप्रबोधनाचे काम केले. आधुनिकरण, वैज्ञानिक दृष्टीकोन, सैनिकीकरण यांचा त्यांनी कायम सन्मान केला. 

183

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांचे जीवन हे राष्ट्रासाठी पूर्णतः समर्पित केले होते. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर केलेली प्रत्येक कृती ही स्वातंत्र्य चळवळीला अधिकधिक प्रोत्साहन देणारी ठरली. अशीच एक त्यांची धाडशी कृती होती, जिच्यामुळे विश्वाचे लक्ष भारताच्या स्वातंत्र्य चळवळीकडे वेधले गेले, ती वीर सावरकर यांनी मार्सेलिस समुद्रात मारलेली उडी होती! कारागृहात सडत राहण्यापेक्षा स्वातंत्र्यदेवीच्या उपासनेसाठी कारागृहातून बाहेर पडणे रास्त मानून त्यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता हे धाडसी कृत्य केले होते. आज गुरुवार, ८ जुलै रोजी या घटनेला १११ वर्षे पूर्ण झाली आहेत. अवघा स्वतंत्र भारत आज त्यांच्या या धाडसाबद्दल ऋणी आहे.

…आणि स्वातंत्र्याचा आवाज जगभरात बुलंद झाला! 

वीर सावरकर यांचा त्यांचा आयुष्यात एकच सिद्धांत होता. जर शरीरात ऊर्जा आहे, प्राण आहे, चेतना आहे, तर तिचा वापर फक्त आणि फक्त स्वातंत्र्य चळवळीसाठीच करायचा. मग कारागृहात राहून हे सध्या कसे होणार? त्यांच्या याच तळमळीतून त्यांनी पारतंत्र्यात स्वतंत्र हिंदुस्थानाचा राष्ट्रध्वज निर्माण केला आणि तो त्यांच्या योजनेनुसार २२ ऑगस्ट १९०७ रोजी स्टुटगार्ड येथे मादाम कामा यांनी फडकावला. तेव्हापासून या राष्ट्रध्वजाला वैश्विक पातळीवर ओळख मिळाली. त्यानंतर ८ जुलै १९१० रोजी वीर सावरकर यांनी स्वातंत्र्य चळवळीला जागतिक पातळीवर पोहचवण्यासाठी मार्सेलिस समुद्रात मारलेली उडी, या घटनेने जगभरात हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीचा आवाज बुलंद केला.

(हेही वाचा : माझी जन्मठेप मधील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आजही प्रेरणादायक)

सशस्त्र क्रांतीचा विचार आणि ‘ते’ धाडसी कृत्य!

स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र क्रांती करण्याचा ठाम निश्चय स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा होता. म्हणूनच त्यांनी विदेशातून बॉम्ब बनवण्याचे तंत्र शिकून घेतले. ते तंत्रज्ञान आणि २० ब्राउनिंग पिस्तूल त्यांनी विदेशातून भारतात क्रांतिकारकांसाठी पाठवले. एका जाडजूड पुस्तकातील पाने त्या पिस्तुलाच्या आकारात कोरून विलक्षण युक्तीद्वारे त्यांनी ते भारतात पोहचवले. त्याच पिस्तुलाचा वापर करून क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांनी नाशकात कलेक्टर जॅक्सन याला ठार केले. या प्रकरणी अनंत कान्हेरे आणि त्यांचे साथीदार कृष्णजी कर्वे, विनायक देशापांडे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर ते पिस्तूल वीर सावरकर यांनी पाठवले होते, हे उघड झाल्याने लंडनमध्ये वीर सावरकर यांना पकडण्यात आले. तिथे त्यांना ब्रिक्स्टन कारागृहात ठेवण्यात आले. त्यांचे सहकारी त्यांना तिथेच भेटायला जात असत. (या कारागृहात वीर सावरकर यांनी हृदयस्पर्शी पत्र आणि ‘माझे मृत्यू पत्र’ ही कविता लिहिली.) त्यांचे सहकारी त्यांचा हा खटला लंडनमध्ये चालवण्यात यावा, अशी इच्छा व्यक्त करत होते. त्या दरम्यान त्यांनी वीर सावरकर यांना कारागृहातून पळून जाण्याची योजना बनवली. मात्र ती असफल ठरली. परंतु वीर सावरकर यांची योजना मात्र वेगळीच होती. हिंदुस्थानला जात असताना जहाज विविध बंदरांवर थांबणार आहे. हे हेरूनच त्यांनी पोलिसांना फसवून ८ जुलै १९१० रोजी मार्सेलिस समुद्रात उडी घेतली. तेथून पोहत पोहत फ्रांसच्या समुद्र किनारी पोहचले, परंतु तोपर्यंत त्यांचे सहकारी तिथे पोहचले नव्हते आणि दुर्दैवाने त्यांची योजना तिथेच विफल ठरली. त्यांचा उद्देश होता कि, फ्रांसच्या भूमीवर ब्रिटिश त्यांना हात लावू शकत नाही, परंतु त्यांचा अंदाज चुकला आणि त्यांना पुन्हा पकडण्यात आले.

ब्रिटिशांचा खोटारडेपणा आणि जगभरात इंग्लंडची नाचक्की!  

वीर सावरकर यांना अनुमान होता कि, ब्रिटिश त्यांना फ्रान्समध्ये अटक करू शकणार नाही. परंतु ब्रिटिशांनी फ्रान्सवर दबाव टाकून बेकायदेशीररीत्या वीर सावरकर यांना अटक केली. त्यानंतर ब्रिटिशांनी त्यांच्या या अवैध कृत्याला लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र वीर सावरकर यांच्या सहकाऱ्यांनी ब्रिटिशांच्या या गैरकृत्याचा पर्दाफाश करून जगभरात तो पोहचवला. त्यानंतर जगभरातील वृत्तपत्रांमधून ब्रिटिशांवर टीकेची झोड उगारण्यात आली. फ्रान्सने त्यांची बदनामी होत आहे, म्हणून वीर सावरकर यांना फ्रान्सकडे सोपवण्याची मागणी केली. म्हणून लंडन आणि फ्रान्स  या दोन्ही देशांनी हे प्रकरण दिखाव्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालवण्याचा निर्णय घेतला. वास्तविक इंग्रजांना कोणत्याही परिस्थितीत वीर सावरकर यांना मुक्त करायचे नव्हते. म्हणूनच त्यांनी वीर सावरकर यांना ५० वर्षांची आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली.

(हेही वाचाः इतिहासातील चुकांची पुनरावृत्ती नको असेल, तर वीर सावरकरांना आत्मसात करा! – रणजित सावरकर )

ब्रिटिशांच्या खोटारडेपणाचा जगभरातील वृत्तपत्रांनी घेतला समाचार! 

  • ललिबरसियांन (फ्रेंच वृत्तपत्र) १२ जुलै १९१० रोजीचा संपादकीय – इंग्लंडचे कुख्यात साम्राज्य रक्तपात आणि दडपशाहीवरच आधारलेले आहे. सावरकरांना फ्रान्सच्या भूमीवर केलेली अवैध अटक त्यांचे प्रत्यंतर आहे. फ्रान्सच्या सरकारने फ्रान्सची क्रांतीची वैभवशाली परंपरा राखायला हवी.
  • द प्रेसेन्स (वृत्तपत्र) –  फ्रान्सच्या विदेश मंत्र्यांकडे मागणी केली कि, सावरकरांना परत मिळवण्यासाठी खटपट करावी.
  • मसियर जॉन जोर (मारसेल्सचे नगराध्य्क्ष) – ब्रिटिशांना तार करून सावरकरांना पुन्हा फ्रान्सच्या ताब्यात देण्यासाठी सुनावले.
  • ल एबलर (वृत्तपत्र)  १६ जुलै १९१० रोजीचे वृत्त – स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना आश्रय देण्याची फ्रान्सची परंपरा आहे. तिला फ्रान्स सरकारने भ्याडपणाने काळिमा फासला आहे. प्रत्येक फ्रेंच नागरिकाला शरमेने मान खाली घालायची वेळ आली आहे.
  • द टेम्पस (वृत्तपत्र) १८ जुलै १९१०  रोजीचे वृत्त – सावरकरांच्या अलौकिक शौर्याचे कौतुक प्रत्येक फ्रेंच नागरिकाने करायला हवे.
  • ल मातां (वृत्तपत्र) २१ जुलै १९१० रोजीचे वृत्त – फ्रान्सने सावरकरांना सोडवले नाही तर जगात तोंड दाखवता येणार नाही.
  • द डेली न्यूज (इंग्लंडमधील वृत्तपत्र) २२ जुलै १९१०रोजीचे वृत्त – ब्रिटिश पोलिसांच्या कृतीने त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याची टवाळीच केली आहे.

(हेही वाचा : द्रष्ट्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आजही ‘राष्ट्रहिताचे’!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.