ठाकरे सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय! सरळसेवेतील पदं एमपीएससी मार्फत भरणार

69

टीईटी आणि म्हाडा तसेच एमपीएससी या परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळानंतर आता राज्य सरकारने महिला व बालविकास विभागाअंतर्गत सरळसेवेने भरली जाणारी बालविकास प्रकल्प अधिकारी (गट-ब) व समकक्ष पदे आता राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरली जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. अनेक वर्षांपासून सरळसेवेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

म्हणून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

एमपीएससी आणि सरळसेवा परीक्षा पद्धतीमध्ये प्रचंड तफावत असल्याने, सरळसेवेची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सरळसेवेच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षेची रचना ही 200 गुणांसाठी 100 प्रश्न, अशी असून राज्यातील जवळपास तीन लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व वयाची अर्हता पूर्ण करणारे विद्यार्थी गेल्या तीन वर्षांपासून परीक्षेची तयारी करतात. मात्र, आता अचानक यात बदल करून ही परीक्षा ‘एमपीएससी’मार्फत होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

( हेही वाचा: …म्हणून सानिया मिर्झाने केली निवृत्तीची घोषणा )

सरळसेवेच्या माध्यमातून परीक्षा घ्या

महिला व बालविकास विभागाअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (गट-ब) व समकक्ष पदे ही अनेक वर्षांपासून सरळसेवा भरती प्रक्रियेच्या माध्यमातून घेतली जातात. निवडक पदवी किंवा पदव्युत्तर धारकांसाठी ही पदे असतात. ‘एमपीएससी’ची परीक्षा पद्धती वेगळी आहे. आता अचानक सेवा प्रवेश नियमावली बदलून ही पदे राज्यसेवा स्पर्धा परीक्षेत समाविष्ट करण्यासंबंधी हालचाली सुरू आहेत. यासंदर्भात राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून सरकारला निवेदन पाठवत ही भरती प्रक्रिया सरळसेवेच्या माध्यमातूनच घेतली जावी, अशी मागणी केली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.